सीमा आढे (प्रतिनिधी) झी 24 तास मुंबई : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एका विधानाची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू आहे. मी चक्रम स्वत:चं घरही जाळेन असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलंय. दरम्यान संजय शिरसाट असं का म्हणाले? त्यामागे नेमकं काय कारण आहे, जाणून घेऊयात.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट स्वतःचं घर जाळायला निघालेत. संजय शिरसाटांच्या मुलाच्या कंपनीनं संभाजीनगरचं विट्स हॉटेल खरेदी केलंय. या हॉटेलच्या खरेदीवरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिरसाटांवर आरोप केलेत. 110 कोटींचं हॉटेल 65 कोटींना खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या आरोपांमुळं व्यथित झालेल्या संजय शिरसाटांनी थेट आपलं घर जाळण्याच्या मनस्थिती आल्याचं म्हटलं आहे.
संजय शिरसाटांच्या या आरोपांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सडेतोड उत्तर दिलंय. संजय शिरसाट फक्त घराला आग लावण्याच्या बाता मारत आहेत असा टोला दानवेंनी लगावलाय. संजय शिरसाटांनी हॉटेलच्या विक्रीवरुन अंबादास दानवे आणि संजय राऊतांना थेट आव्हान दिलंय. हॉटेलच्या व्यवहारातून सिद्धांत शिरसाटांना माघार घ्यायला लावतो हिंमत असेल तर दानवे किंवा राऊतांनी हॉटेल विकत घेऊन दाखवावं असं आव्हान शिरसाटांनी दिलं आहे.
संजय शिरसाटांनी दिलेल्या आव्हानावर शिवसेनेनं पुन्हा पलटवार केलाय. आपला हॉटेलचा व्यवसाय नाही. त्यामुळं आपल्याला हॉटेल खरेदीत रस नसल्याचं अंबादास दानवेंनी सांगितलं. संभाजीनगरच्या विट्स हॉटेलची खरेदी वादात सापडलीय. विरोधकांच्या आरोपांच्या बाणांमुळं संजय शिरसाट घायाळ झाल्याचं दिसतंय. हॉटेल नको पण आरोपांच्या फैरी आवरा या मानसिकतेपर्यंत ते आल्याचं दिसतंय.