Amit Thackeray: लहानपणी माझ्या वडिलांनी जो मला सल्ला दिला होता तो जर मी ऐकला असता तर आज माझं देखील एक व्यंगचित्र इथं दिसलं असतं, अशी मनातील खंत एका कार्यक्रमात त्यांनी बोलून दाखवली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने आयोजित बोलक्या रेषा व्यंगचित्र प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाला मनसे नेते अमित ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी व्यंगचित्रांच्या बाबत आपलं मत व्यक्त केलं. यावेळी या कार्यक्रमाला ज्या मुलांचे व्यंगचित्रांसाठी नंबर आले त्यांना बक्षीस देखील देण्यात आलं आहे.
आज मला एवढं वाईट वाटत आहे की माझ्या वडिलांनी जो मला सल्ला दिला होता. तो जर मी ऐकला असता तर आज माझं देखील एक व्यंगचित्र इथं दिसलं असतं. त्यांनी मला लहानपणी एकच सल्ला दिला होता की काहीही कर पण दिवसातून एकदा चित्र काढत जा. पण मी तो ऐकला नाही, अशी खदखद महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी बोलून दाखवली.
अमित ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे की, व्यंगचित्राची कला ही तुम्हाला कोणी शिकवत नसतं ही कला तुमच्या आत असते किंवा नसते. माझे अनेक मित्र आहे जे ड्रॉईंग शिकले व्यंगचित्र शिकायचा प्रयत्न देखील केला पण त्यांना एक साधी रेषा देखील काढता येत नाही. आज याठिकाणी लहान मुलांचं व्यंगचित्र पाहून खूपच आनंद झाला आहे. तुमची ही कला असून ती वाया घालवू नका. मला जो माझ्या वडिलांनी सल्ला दिला होता तोच मी तुम्हाला देईल. की कितीही आयुष्यात व्यस्त झाला तरी एक तास हे व्यंगचित्राला देत जा, असा सल्ला यावेळी अमित ठाकरे यांनी उपस्थित मुलांना दिला.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला आज आपल्या भारतीय सैन्याने चोख उत्तर दिलं आहे. त्यासाठी भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम! पण या साऱ्या पार्श्वभूमीवर मनात एक सल आहे, ज्यांनी भारतात घुसखोरी करून आपल्या नागरिकांवर क्रूर हल्ला केला, ते दहशतवादी अजूनही मोकाट फिरत आहेत. जेव्हा आपल्या सैन्याच्या हातून ते ठेचून मारले जातील, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण झाल्याचं समाधान मिळेल, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. आजची सैन्याची कामगिरी नक्कीच अभिमानास्पद आहे, पण त्यातून पूर्ण समाधान मिळालं असं वाटत नाही. कारण शत्रू पूर्णपणे संपला नाही, आणि जोपर्यंत तो आहे, तोपर्यंत आपली वेदना कायम आहे. पहलगाममधील हा हल्ला केवळ एका राज्यातील नव्हे, तर संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेवर झालेला आघात आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर हे युद्ध नव्हे, कारण युद्धामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास हा नाहक आहे, असंदेखील ते पुढे म्हणाले आहेत.