IMD Weather Update of 23 June 2025: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राज्यात मान्सूनने जोर पकडला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पावसामुळे शहराच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईत दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने काहीसं विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचं दमदार पुनरागमन होणार आहे. हवामान खात्यानुसार कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि पुणे जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक जाणवणार आहे.
राज्यातील इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण आठवडाभर आकाश ढगाळ राहणार आहे. मोसमी वाऱ्यांनी 16 जून रोजी राज्यभर पसरत आपली पकड मजबूत केली असून, आता ते गुजरात व मध्य प्रदेशच्या दिशेने सरकत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरातील पाण्याचं तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून पावसासाठी अनुकूल ढग तयार होत आहेत. यंदा ‘ला-निना’चा प्रभाव असल्याने महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, महाराष्ट्रावर हवेचा दाब कमी राहिल्यास सोमवारपासून पावसाचा जोर अधिक वाढेल. आतापर्यंत पावसाने दडी मारलेले भाग देखील या आठवड्यात दमदार पावसाचा अनुभव घेतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुसळधार पावसाचा इशारा:
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक
अतिमुसळधार पावसाचा इशारा:
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा
गडगडाटासह पाऊस:
अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर
हलक्या सरींची शक्यता:
धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्या नगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव
हवामानाच्या या बदलत्या परिस्थितीमुळे नागरिकांनी गरज असल्याशिवाय घराबाहेर पडणं टाळावं आणि हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.