Indian Capital From Delhi To Nagpur: भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी नागपूरला हलवण्याची मागणी करण्यात आली आहे. भौगोलिकदृष्ट्या दिल्ली पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांच्याजवळ असल्याने नागपूरला राजधानी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिल्लीला हल्ल्याचा धोका होऊ शकतो. दिल्ली देशाची राजधानी आहे आणि या शहरामध्ये सर्वात महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांची आणि धोरणात्मक कक्ष आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या युद्धाच्या किंवा लष्करी आक्रमणांच्या धोका लक्षात घेता देशाची राजधानी नागपूरला हलविण्याची मागणी एका माजी खासदाराने केली.
दिल्लीला राजधानी घोषीत करण्याआधी ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीच्या काळात भारताच्या पूर्वेकडे असलेलं कोलकाता (कलकत्ता) शहर भारताची राजधानी होती. मात्र, प्रशासनात सुलभता, दिल्लीचे भौगोलिक स्थान आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन 12 डिसेंबर 1911 रोजी किंग जॉर्ज पंचम यांच्या उपस्थितीत दिल्लीला देशाची नवी राजधानी म्हणून जाहीर करण्यात आलं. त्यानंतर नवी दिल्लीचे नियोजन आणि बांधकाम प्रसिद्ध वास्तुविशारद एडविन ल्युटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी केले. 1931 साली नवी दिल्ली अधिकृतपणे राजधानी म्हणून कार्यान्वित झाली. मात्र आता भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांच्याजवळ असल्याने नागपूरला राजधानी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरचा विचार देशाची राजधानी म्हणून करावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री खासदार विलास मुत्तेमवार यांनी केली आहे. राजधानी दिल्लीला असलेला संभाव्य धोका लक्षात घेता, आपत्कालीन पर्यायी म्हणून नागपूरचा विचार करता येईल असं मुत्तेमवार यांनी म्हटलं आहे. "यासंदर्भात मी लोकसभेत अनेक वेळा ही मागणी केली. आज भारत पाकिस्तान तणावाच्या स्थितीतही माझी हीच मागणी आहे," असं मुत्तेमवार म्हणाले. "2001 आणि 2013 मध्ये मी संसदेत ही मागणी केली आणि नंतर एक महिन्यातच संसदेवर हल्ला झाला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे ही मागणी केली होती," असंही मुत्तेमवार यांनी सांगितलं.
नागपूरला भारताची राजधानी बनवण्याचा विचार यापूर्वीही काही वेळा करण्यात आला आहे. 1930 च्या दशकात ब्रिटिश राजवटीच्या काळात, भारतात अनेक ठिकाणी राजधानी बदलण्यावर चर्चा झाली होती. नागपूरच्या भौगोलिक स्थानामुळे आणि मध्य भारतात स्थित असल्यामुळे, त्याला राजधानी बनवण्याचा विचार काही काळ केला गेला. यानंतर 1950 च्या दशकात याबाबत पुन्हा चर्चा झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर, विशेषत: 1950 च्या दशकात, नागपूरला राजधानी बनवण्याचा विचार झाला. दिल्ली जास्त पूर्वेतील भागात स्थित आहे आणि भारतीय राज्यसंस्थेची सर्व प्रमुख कार्यालये तसेच संसद दिल्लीमध्ये होते. काही लोकांना मध्य भारतातील नागपूर अधिक योग्य ठिकाण वाटत होते. यामुळे एकूणच नागपूरच्या संभाव्यतेवर चर्चा होती, परंतु या विचाराला तांत्रिक, राजकीय आणि इन्फ्रास्ट्रक्चरल आव्हानांचा सामना करावा लागला आणि हा विचार मागे पडला. मात्र आता भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा या मागणीनं डोकं वर काढलं आहे.