Indian Railways Special 10 Days Package Chhatrapati Shivaji Maharaj History: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी बीकेसीतील जियो कन्व्हेशन सेंटरमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील रेल्वेसंदर्भात काय कामं सुरु आहेत याची माहिती देतानाच भविष्यात कोणती कामं, प्रकल्प राबवले जाणार आहेत याची माहितीही देण्यात आली. ही महिती देतानाच मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली असून ही घोषणा सर्वच शिवप्रमेंना सुखद धक्का देणारी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेला 10 दिवसांची पर्यटन सहल रेल्वेमार्फत आयोजित केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत केली. रेल्वेच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यास मदत होईल, असा विश्वासही या दोघांनी पत्रकारांसमोर बोलून दाखविला.
विदर्भातील गोंदिया ते बल्हारशाह या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी तब्बल 4819 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व आंध्र प्रदेशशी व्यापार -व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.
महाराष्ट्रात रेल्वे विकासासाठी विक्रमी निधी देण्यात आला असून, याद्वारे 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही समावेश आहे. यावर्षी रेल्वे अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला 23 हजार 700 कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नक्की वाचा >> रेल्वे तिकीट Cancel करताना 2 लाखांचा गंडा, OTP सांगितला नाही पण..; तुमच्याकडूनही होऊ शकते 'ही' चूक
मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी लोकलची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वेने नियोजनबद्ध आराखडा तयार केला असून, सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर लोकलचा प्रवास सुसह्य होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. मुंबई परिसरासाठी 17 हजार कोटींची कामे सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली. महाराष्ट्रात सध्या रेल्वेची 1 लाख 73 हजार कोटींची कामे सुरू आहेत, असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
मुंबईसाठी 238 नव्या एसी गाड्या दिल्या जाणार आहेत, असंही रेल्वे मंत्री म्हणाले. येत्या काळात मुंबई लोकलच्या ताफ्यात 238 नवीन एसी लोकल दाखल करण्यात येणार असून, त्यांच्या डिझाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुंबईतील प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन या खास डिझाइन करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेमध्ये सामावून घेण्याची विनंती केंद्र शासनाला केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.