Kashedi Ghat Tunnel: उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्यात 15 मे रोजी वीजपुरवठा सुरू झाल्याने तो पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित झाला आहे. हा घाट बोगदा हा दोन किलोमीटर लांबीचा असून, त्याला जोडणाऱ्या रस्त्यांसह संपूर्ण मार्ग सुमारे नऊ किलोमीटरचा आहे.
कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यांतील अंतर्गत गळती दुरुस्त करण्याचे काम सुरू असून 15 मेपूर्वी वाहतुकीसाठी ते पूर्ण क्षमतेने खुले करण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यादृष्टीने बोगद्याचे काम सुरू होते. आता अखेर बोगद्यातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. या बोगद्यामुळं 40 ते 45 मिनिटांचा वळसा वाचून अवघ्या 10 ते 15 मिनिटांत रायगडमधील पोलादपूर ते रत्नागिरीतील खेडमधील कशेडीपर्यंतचा प्रवास शक्य होत आहे.
बोगद्यात दोन्ही बाजूंनी २०० पथदीपांची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. या पैकी बहुतांशी काम पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत प्रवास अधिक सुकर होणार आहे. आता मुंबईकडे येणाऱ्या बोगद्याप्रमाणेच रत्नागिरीकडे जाणाऱ्या बोगद्यातही वीज यंत्रणा सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुसाट असा होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याती खेड येथे भीषण अपघात झाला आहे. कार अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. जगबुडी नदी पात्रात कार थेड कोसळून हा अपघात झाला होता. कार थेट नदीत कोसळल्यामुळं पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर, एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईनजीकच्या मिरा रोडयेथील कुटुंब देवरुख येथे जात होते. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जात असतानाच वाटेतच काळाने घाला घातला. मुंबई- गोवा महामार्गावर जगबुडी नदीच्या पुलावरुन कार थेट 100 फुट खाली कोसळली. यामध्ये कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत कार चालक गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.