Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'माननीय चोरसाहेब, जीवावर उदार होऊन आपण...', सततच्या चोरीला वैतागले वकिलाने थेट चोराला लिहिलं पत्र

सततच्या चोरीला कंटाळलेल्या जालन्यातल्या एका वकिलांनी घराबाहेर चोरांसाठी एक पत्रच लिहिलं 

'माननीय चोरसाहेब, जीवावर उदार होऊन आपण...', सततच्या चोरीला वैतागले वकिलाने थेट चोराला लिहिलं पत्र

आता बातमी आहे एका आगळ्यावेगळ्या पत्राची. सततच्या चोरीला कंटाळलेल्या जालन्यातल्या एका वकिलांनी घराबाहेर चोरांसाठी एक पत्रच लिहिलं आहे. सध्या ते जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय. नेमका का विषय आहे तरी काय, जाणून घ्या. 

जालन्यातील वकील ललित हट्टेकर, त्यांचं एसटी कॉलनीत वडिलोपार्जित घर आहे. याच घरात 5 महिन्यांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला. वकीलाच्या घरातून चोरांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण 10 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. वकील हट्टेकरांनी पोलीस तक्रार केली. पण चोर काही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. मात्र मागच्या काही महिन्यात वकील हट्टेकर यांच्या घरी पुन्हा 2 वेळा चोरी झाली. यावेळी चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही. मात्र वकील ललित हट्टेकरांचं कुटुंब सततच्या चोऱ्यांमुळे घाबरलं. अखेर हतबल जालेल्या हट्टेकर यांनी घराच्या भिंतीवर या अज्ञात चोरांसाठी एक पत्रच लिहून टाकलं आहे. 


वैतागलेल्या वकिलाचं चोराला पत्र

"माननीय चोरसाहेब, सस्नेह नमस्कार, जोखीम त्याचप्रमाणे तंत्रज्ञान, समन्वय आणि जीवावर उदार होऊन आपण करीत असलेल्या कलेला वंदन. आपली ओळख नाही. परंतु 3 चोऱ्यांच्या वेळी आपल्या वाट्याला निराशा आली असेल. एक वेळेस मात्र, आपण माझ्या आयुष्यभराची कमाई घेऊन गेलात. मी पत्नी आणि मुलासह घरात राहतो. घरात सोने-चांदी,पैसे नाहीत. भांडीकुंडी, वॉशिंग मशीन आणि इतर सामान आहे. त्यामुळे घरफोडी करून माझा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका. कडी-कोयंडे तोडल्यामुळे माझे नुकसान होते.चोरीसाठी तुम्हाला ही जागा आदर्श वाटत असेल. मोठी रक्कम दिल्यावर हे घर तुम्हाला विकू शकतो. मग तुम्ही तेथे अवैध धंदे करू शकाल" वकील ललित हट्टेकर यांनी भिंतीवरील पत्रात हा सगळा मजकूर लिहिलाय. वर आपल्याकडे शस्त्र परवाना असल्याची जाणीवही चोरट्यांना करून दिलीय.

वकील ललित हट्टेकर यांनी हे पत्र लिहून दिड महिना झाला आहे. दीड महिन्यात त्यांच्या घराकडे चोरटे फिरकलेही नाहीत.त्यामुळे हे पत्र लिहून फायदाच झाला असा दावा हट्टेकर यांनी केला आहे.

जालन्यात शहरी भागासह ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. चोरीच्या  गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांनाही अपयश येत आहे. महिनाभरात जिल्ह्यात शेकडो चोऱ्या होत आहेत. अशा चोरटयांना वकील हट्टेकरांनी पत्र लिहून त्यांच्या पद्धतीने धडा शिकवला आगे. मात्र आता ही बातमी बघून पत्र वाचायला पुन्हा चोर हट्टेकरांच्या घराला भेट द्यायला नको म्हणजे झालं.. 

Read More