Loksabha Elections 2024 Live Updates : बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकीचा निकाल अखेर लागला. एनडीए 292 जागा, इंडिया आघाडी 234 विजय मिळाला आहे. 17 जागांवर इतर पक्षांचा उमेदवारांचा विजय झाला आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी 31 तर महायुतीला 17 जागांवर विजय मिळालाय. त्यामुळे आता सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरुवात झाली असून आज दिल्लीत बैठकीचं सत्र असणार आहेत. अनेक दिग्गज नेते दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.
फडणवीसांना जनतेनेच मुक्त केलं, फडणवीसांना आता कोणतंही काम राहिलेलं नाही - संजय राऊत
नितीश कुमार, चंद्राबाबूंचं एनडीएला समर्थन, एनडीए करणार सत्तास्थापनेचा दावा - सूत्र
एका निवडणुकीने सगळं काही संपत नसतं - एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
"हे जे यश-अपयश आहे ते सामूहिक जबाबादारी आहे असं समजतो. आम्ही टीम म्हणून काम केलंय. राज्यात मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा आम्ही एकत्र काम केलंय. यापुढे देखील एकत्र काम करायचं आहे. त्यामुळं ही सामूहिक जबाबदारी आहे. एका निवडणुकीने सगळं काही संपत नसतं. एका निवडणुकीमुळं हार-जीत आम्ही खचून जाणारे नाही. त्यांनी काही भावना व्यक्त केल्या असतील पण आम्ही टीम म्हणून काम करत राहणार आहोत - एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई झाली तर तो मोठा धक्का असेल - सुषमा अंधारे
अत्यंत वाईट प्रदर्शन झाल्याने कारवाई होऊ शकते. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कारवाई होऊ शकते, प्रदेशाध्यक्षपद जाऊ शकतं यावरही चर्चा झाली असावी. हे सगळं पाहता देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई झाली तर तो मोठा धक्का असेल. त्यापूर्वी त्यांना आदरपूर्वकपणे बाहेर जाण्याची परवानगी मागावी या आशेने त्यांनी ही मागणी केली असावी - सुषमा अंधारे
भाजप नेत्यांच्या फडणवीसांची चर्चा, फडणवीसांच्या नेतृत्वात काम करणार, देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहून पक्षासाठी काम करावं - चंद्रशेखर बावनकुळे
आमच्या बैठकीत असा कोणताही निर्णय झालेला नाही, त्यांनी या पत्रकार परिषदेत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावेळी त्यांनी केंद्राशी चर्चा करुन निर्णय घेणार असेही सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही - चंद्रशेखर बावनकुळे
"भाजपाला वाटत होत आम्हीच राजे आहोत. जनतेनी भाजपला नाकारलं आहे. फडणवीस यांना राजीनामा द्यावा किंवा नाही हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पण जनतेनी भाजपाला त्यांची जागा दाखवली आहे" - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलीय... लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी ही माझी असल्याचं त्यांनी मान्य केलं. मला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती केंद्रीय नेतृत्त्वाकडे करणार आहे...विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीनं पक्षासाठी संपूर्ण वेळ देणार असल्याचं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.
दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार बनणार असून सरकार बनवण्यासाठी फॉर्म्युला तयार, असा दावा नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केलाय.
सत्ता स्थापनेसाठी हालचालीला वेग आला असून नितीश कुमार NDAच्या बैठकीत सहभागी होणार, अशी माहिती समोर आलीय. बैठकीत जेडीयू पाठिंब्याचं पत्र एनडीएला देणार, अशी माहिती जेडीयूचे प्रवक्ते के सी त्यागी यांनी दिली आहे. NDAची बैठक आज संध्याकाळी दिल्लीत होणार आहे.
टीडीपीने एनडीएवर दबावतंत्राचा वापर करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यासाठी हा दबावतंत्र वापरला जातोय...लोकसभा अध्यक्षपद, अर्थ, कृषी, रस्ता वाहतूक, ग्रामीण विकास, आरोग्य, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार खातं मागण्याची शक्यता आहे...जवळपास 5 ते 6 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...टीडीपीला 16 जागा मिळाल्यायत...त्यामुळे केंद्रात मोदींना पुन्हा सरकार बनवण्यासाठी टीडीपीला महत्त्व आलंय...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बैठक आज होणार आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी समर्थन पत्र सुपूर्द करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 17वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली. सध्याच्या 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला संपणार आहे. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. मात्र राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच लोकसभा विसर्जित होऊ शकते. आता मंत्रिमंडळाने लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली असून, राष्ट्रपतींच्या मान्यतेने 17वी लोकसभा विसर्जित केली जाणार आहे.
आताची सर्वात मोठी बातमी आहे. दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी बैठकांचं सत्र सुरु असताना मोदी सरकाने आपली रणनिती आखली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 8 जूनला मोदी सरकारचा तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
एनडीएमधील घटकपक्ष असेलल्या टीडीपी आणि जेडीयू या दोन घटकपक्षांवर सत्तास्थापनेचं सारं गणित अवलंबून आहे. असं असतानाच आता अचानक या दोन्ही पक्षांचं महत्त्व फारच वाढलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडीला वेग आला आहे. दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्यापूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. तेव्हा ते म्हणाले की, सत्ता स्थापनेसाठी आजच्या बैठकीत रणनिती ठरणार आहे. तर एका पत्रकाराने विचारलं की, तुम्ही चंद्रबाबू नायडू, नितीश कुमारशी बोलणार का? त्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले की बैठकीत जो निर्णय होईल त्यानंतर गोष्टी घडतील. संख्याबळ ठरवून सत्ता स्थापनेचा निर्णय होईल. त्यात आज ही इंडिया आघाडीची पहिलीच बैठक आहे. त्यामुळे आता काही स्पष्ट सांगता येणार नाही. सत्ता स्थापनाबद्दल ते म्हणाली की, 'हे माझ्या एकट्याच मत नसून हे ते सर्व नेते मिळून त्याबद्दल निर्णय घेतील.'
दिल्लीत अखिलेश यादव चंद्राबाबू नायडू यांची भेट होण्याची शक्यता आहे...इंडिया आघाडीकडून नायडूंशी संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर दिलीये...तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची शक्यताये...
गेल्या 15 वर्षानंतर दिल्लीतील राजकारणातून मुंडे-महाजन कुटुंबातलं कुणीच नाहीये...प्रीतम मुंडेंना उमेदवारी नाकारून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली...मात्र, बीडमध्ये शरद पवार गटाच्या शरद सोनावणेंनी पंकजांचा पराभव केला...त्यामुळे दिल्लीत जाणा-या पंकजांना सोनावणेंनी रोखलं...तर दुसरीकडे मुंबईतून पूनम महाजन यांचं तिकीट भाजपने कापलं...त्यामुळे आता भाजपला सुरूवातीच्या काळात उभारी देणा-या मुंडे-महाजन कुटुंबातील कुणीही सदस्य दिल्लीच्या राजकारणात नाहीये...
दिल्लीत आज एनडीएची बैठक होत असतानाच विरोधी पक्ष इंडिया आघाडीचीही महत्त्वाची बैठक पार पडणारेय. एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीत दाखल होणारेत. तेजस्वी यादव हे देखील इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला रवाना झालेत. विशेष म्हणजे दिल्लीसाठी हे दोन्ही नेते एकाच विमानानं रवाना झालेत. त्यामुळे आता NDA सरकार स्थापनेपूर्वी राजकारणात मोठा ट्विस्ट येणार का याकडे लक्ष असेल.
आज दिल्लीत होणा-या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीत दाखल झालेत.. उद्धव ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि अनिल देसाई या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी संध्याकाळी 6 वाजता ही बैठक पार पडेल. इंडिया आघाडीनं सर्वच्या सर्व 28 पक्षांना या बैठकीसाठी निमंत्रण दिलंय.. सत्तास्थापनेसाठी एनडीएतील मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणारेय... अशातच इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्यात. त्यामुळे इंडिया आघाडीदेखील देशातील इतर लहान पक्ष आणि एनडीएतील काही पक्षांना आपल्याबरोबर घेऊन सत्तास्थापनेचा दावा करू शकते. त्यासाठी ही बैठक बोलावण्यात आलीये.
10 वर्षांच्या अँटी इनकम्बन्सीचा फटका
400 पारचा नारा ठरला बूमरँग
संविधान बदलणार, विरोधकांचा आरोप
मुस्लीम, दलित मते एकवटली
भारत जोडो यात्रांमुळं विरोधी वातावरण
यूपीत सपा-काँग्रेस युती भाजपला वरचढ
फोडाफोडीचं राजकारण अंगलट आलं
शेतकरी आंदोलन, महागाईचा फटका
अग्निपथ योजनेवरून सरकारवर नाराजी
राममंदिराचा फायदा झाला नाही
मोदींना पुन्हा पंतप्रधान बनण्यापासून रोखण्यासाठीच्या प्रयत्नांना साथ देण्याची तयारी एमआयएमच्या ओवैसी यांनी दर्शविली. लोकसभा निवडणूक निकालानंतरचं ओवैसीचं हे मोठं वक्तव्य असून आता नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे...लोकसभा निकालावर फडणवीस बोलण्याची शक्यता आहे...यावेळी महाराष्ट्रात भाजपला हवं तसं यश मिळालेलं नाहीये...फक्त 9 जागांवरच भाजपचा विजय झालाय...त्यामुळे फडणवीस या निकालावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...
भाजपाच्या या विजयावर पंतप्रधान मोदींनी 'गुड फ्रेंड' म्हणणाऱ्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी अभिनंदन केलंय.
लोकसभा निकालानंतर आज दिल्लीत एनडीएची सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वाची बैठक होणारेय. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता आहे. अजित पवार गटाकडून पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत.
बीडमध्ये शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणेंनी भाजपच्या पंकजा मुंडेंचा पराभव केलाय...माझा विजय होणार होता म्हणून मी संयमाने होतो...मात्र, शेवटपर्यंत त्रास द्यायचं काम विरोधकांनी केलं...बीडची जनता सोबत असल्यामुळे विजय झाल्याची प्रतिक्रिया सोनावणे दिलीय...आता बीडचं राजकारण आम्हाला विचारल्याशिवाय यापुढे होणार नाही...असं म्हणत बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंना आव्हान दिलंय...
दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांचा विजय झालाय. त्यांनी भाजपच्या सुजय विखे पाटलांचा 29 हजार मतांनी पराभव केलाय. विजयानंतर बोलताना त्यांनी भाजपच्या स्टेजवर उभे राहूनही मला मदत करणा-या त्या सर्व अदृश्य शक्तीचाही हा विजय असल्याचं म्हटलंय.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील निकालाला शिवसेना ठाकरे गट आव्हान देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे अखेरच्या निकालात आघाडीवर असताना फेर मतमोजणी घेण्यात आली आणि यामध्ये कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला...या निकालामध्ये गडबड झाल्याचा शिवसेना ठाकरे गटाला संशय आहे, त्यामुळे या निकालाला शिवसेना ठाकरे गट आव्हान देणार असून पक्षाकडून यासंबंधी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे...या सगळ्या संदर्भात शिवसेना ठाकरे गट राष्ट्रपतींना सुद्धा पत्र पाठवणार असल्याची माहिती मिळतेय...
एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार घडामोडी वेग आला आहे. सत्ता स्थापनेच्या दिल्लीत मोर्चेबांधणी सुरु आहे. दिल्लीतील बैठकीसाठी दोन्ही नेते नितीश कुमार, तेजस्वी यादव एकाच विमानानं दिल्लीला जाणार आहेत.
मोदी सरकारची आज शेवटची कॅबिनेट बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीत 17वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस होणार आहे. त्यानंतर नव्या सरकारचा मार्ग मोकळा होणार. त्यानंतर सरकारच्या कामकाजाचाही प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
नागपूरमधून नितीन गडकरी निवडून आल्यानंतर आज ते दिल्लीला जाणारेत. गडकरींनी लोकसभा निवडणुकीतील विजयाची मालिका अखंड राखलीय.
NDAच्या दोन घटकपक्षांची कामगिरी दमदार झालीय...आंध्र प्रदेशमध्ये TDP आणि बिहारमध्ये नितीश कुमारांना चांगलं यश मिळालंय...बिहारमध्ये जेडीयूने 16 जागा लढवल्या होत्या...आणि त्यातील 15 जागांवर विजय मिळवलाय...तर टीडीपीने 16 जागा जिंकल्यायत...यासोबतच आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत टीडीपीने 175 विधानसभा जागांपैकी 135 जागा जिंकल्यायत...त्यामुळे टीडीपी आणि जेडीयूच्या विजयाने राष्ट्रीय स्तरावर त्यांचं महत्त्व वाढवलंय...
आज इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी संध्याकाळी 6 वाजता ही बैठक पार पडेल. इंडिया आघाडीनं सर्वच्या सर्व 28 पक्षांना बैठकीसाठी निमंत्रण दिलंय. उद्धव ठाकरेही या बैठकीला उपस्थित राहणारेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील बैठकीसाठी उपस्थित राहणारेत. यामुळं सरकार कुणाचं येणार? सत्ता परिवर्तन होणार की नेतृत्वबदल होणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झालेत.एकट्या भाजपनं बहुमत मिळवलेलं नसून त्यांना सत्तास्थापनेसाठी एनडीएतील मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणारेय. अशातच इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्यात. त्यामुळे इंडिया आघाडीदेखील देशातील इतर लहान पक्ष आणि एनडीएतील काही पक्षांना आपल्याबरोबर घेऊन सत्तास्थापनेचा दावा करू शकते. इंडिया आघाडीतील नेत्यांनीही अशा प्रकारचे संकेत दिलेत.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.