मध्य रेल्वेची कल्याण कसारा रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान मुंबईकडे जाणारी तपोवन एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाली आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प आहे. कल्याणहून इंजिन शहाड स्थानकाकडे रवाना करण्यात आलं आहे.
बीड हत्याकांड प्रकरणावर उद्या सलग दुसऱ्या दिवशी विधिमंडळात विशेष चर्चा होणार आहे. उद्याच्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड आणि परभणी प्रकरणावर उत्तर देतील.
एलिफंटा बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यामध्ये नेव्हीच्या 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
2025 मध्ये म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे 3500 नव्या साध्या " लालपरी " बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल करण्याचा मनोदय एसटीचे अध्यक्ष व मंत्री भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला. नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली.
आमदार रणधीर सावरकर भाजपचे विधानसभेतील नवे मुख्य प्रतोद असणार आहेत, मागच्या कार्यकाळात आमदार आशिष शेलार भाजपचे मुख्य प्रतोद होते. शेलारांची मंत्रिपदी नेमणूक झाल्याने सावरकर यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.
मुंबईतील समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे. बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, 21 जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान बोटीच्या मालकाने केलेल्या दाव्यानुसार, नौदलाच्या स्पीड बोटने बोटीला धडक दिल्याने ही दुर्घटना झाली आहे.
एलिफंटा बोट दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, 21 जण जखमी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बोटीमधून एकूण 56 प्रवासी प्रवास करत होते. नौदलाच्या 11 बोटी बचावकार्यात दाखल आहेत.
गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. बोटीत 30 हून अधिक प्रवासी असल्याची माहिती आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. उद्या सकाळी दहा वाजता संविधान चौकात महाविकास आघाडी करणार आंदोलन करणार आहे. महाआघाडीतील पक्षांचे आमदार संविधान चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं जाईल.
राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हजर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र होते गैरहजर
उपसभापती निलम गो-हे यांना सभापती करण्यासाठी एकनाथ शिंदे होते प्रयत्नशील
परंतु भाजपने राम शिंदे यांचे नाव घोषित केल्यामुळं एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती
- कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली
- अधिवेशनाचा कालावधी वाढणार नाही
- हिवाळी अधिवेशन २१ डिसेंबरलाच गुंडाळले जाणार
- विदर्भ व मराठवाड्यावर २ दिवस विशेष चर्चा घेण्याचा प्रस्ताव विरोधकांनी दिला
- सत्ताधाऱ्यांकडून याच कालावधीत चर्चा घडवण्याचे आश्वासन
खातेवाटपात शिवसेनेला नगरविकास आणि पर्यटन ही अतिरिक्त खाती मिळणार
या दोन खात्यांच्या बदल्यात परंतु उत्पादन शुल्क खाते मात्र शिवसेनेला सोडावे लागल्याची माहिती
शिवसेनेकडे असलेली इतर खाती मात्र कायम राहणार
सुत्रांची माहिती
मला अनेक ठिकाणाहून फोन येत आहेत. आमचा तालुका, जिल्हा, राज्यात या असं सांगत आहेत. लासलगावमध्ये आपलं कोणीतरी गेल्यासारखी अवकळा पसरली आहे. आपल्याला पेटून उठवायचं आहे, पण पेटायचं नाही. निषेध करताना आपल्याला संयम पाळायचा आहे असं आवाहन छगन भुजबळ यांना नाशिकमध्ये केलं आहे.
21 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार बीड दौऱ्यावर जाणार आहे. शरद पवार मस्साजोगचे सरपंच मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हा मुद्दा विधानसभेत आणि लोकसभेतही विरोधकांनी मुद्दा उचलला होता.
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सांगलीमध्ये आज सामाजिक संघटनांनी एकत्रित येत नागपूर रत्नागिरी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. अंकली येथील रत्नागिरी नागपूर महामार्गावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी सुमारे एक तास ठिय्या मारत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकां ताब्यात घेत महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांवर अन्यायकारक असणारा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा या पुढील काळात सांगली जिल्ह्यामध्ये महायुतीच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही, प्रसंगी त्यांच्या लाल दिव्याच्या गाड्या फोडू असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या अटकेमुळे अटकेत असलेल्या आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विष्णू चाटेच्या अटकेमुळे या प्रकरणात बरीच धक्कादायक माहिती समोर येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भाजपाचे आमदार राम शिंदे यांचा विधान परिषदेच्या सभापतीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीकडून सभापतीपद निवडणुकीसाठी अर्ज भरला जाणार नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक बिनविरोध करण्याची महाविकास आघाडीकडे विनंती केल्याची माहिती समोर येत आहे.
हिवाळी अधिवेशनानिमित्त दिल्लीत असलेले राज्यसभा खासदार शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार हे दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संम्मेलनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी गेल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वीही पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मोदींना निमंत्रण पाठवण्यात आलं असून ते उद्घाटन समारंभाला नक्की येतील असा विश्वास व्यक्त केलेला.
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्यासंदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पहिली अधिकृत प्रतिक्रिया नोंदवली आहे. "योग्यवेळ आल्यावर भुजबळांची भेट घेणार" असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सांगितलं आहे. "भुजबळांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे", असंही तटकरे म्हणाले. "भुजबळांची भेट घेऊन सविस्तर चर्चा आम्ही करणार आहोत", असंही तटकरेंनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या नागपूरमधील 'विजयगड' निवासस्थानातून विधानभवनाकडे रवाना झाले आहेत. अजित पवार आज विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत. अजित पवार घराबाहेर पडले तेव्हा त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा मोठा गराडा दिसून आला.
ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाल सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. भेटीची तारीख अद्याप ठरली नाही मात्र तिन्ही नेते नाशिकमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभेनंतर विधान परिषदेचं अध्यक्षपदही भाजपकडेच राहणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपा महायुतीतर्फे राम शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकाळी 10 वाजता राम शिंदे अर्ज भरणार आहेत. विधान परिषद सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. सभापती निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सभागृहातील पक्षीय बलाबलात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. महायुतीकडे 35 जागांचं बळ असून महाविकास आघाडीकडे केवळ 17 जागा असल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल असं सांगितलं जात आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अजित पवार कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वडगाव मावळच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. माहिती समजताच घटनास्थळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत बिबट्याचे शरीर हे फॉरेस्ट विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
भीमा कोरेगाव प्रकरणात आज आयोगासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीला प्रकाश आंबेडकर हजर राहणार आहेत. भीमा कोरेगाव इथं झालेल्या दंगलीची चौकशी भीमा कोरेगाव आयोगासमोर होत आहे. या प्रकरणात साक्षही नोंदवण्यात आल्या आहेत. आज प्रकाश आंबेडकर 11 वाजता आयोगात हजर राहणार असून त्यानंतर माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अदिती तटकरे, शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस असून पहिल्या दोन दिवसांमध्ये अजित पवार कामकाजात सहभागी झाले नाहीत. आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांच्या विजयगढ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
नागपूरमधील घडामोडींना वेग आल्याचं चित्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पाहायला मिळत आहे. आज सकाळी अजित पवारांच्या नागपूर येथील 'विजयगड' या निवासस्थानी मंत्री हसन मुश्रीफ, पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेण्यासाठी गर्दी केली आहे.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिले दोन दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुणाच्याही गाठीभेटी घेतल्या नाहीत, शिवाय ते सभागृहात देखील अनुपस्थित होते. त्यामुळे अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी तरी अजित पवार सभागृहात येतील का? याकडे लक्ष लागलेल आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी पुन्हा सामूहिक आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. येणाऱ्या 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे सामूहिक आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय. या उपोषणादरम्यान महाराष्ट्रातील मराठ्यांनी इतर कुठेही उपोषण न करता याच उपोषणात येऊन सहभागी व्हावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. ज्यांना उपोषणात बसायचं नाही त्यांनी या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी 25 जानेवारी रोजी अंतरवालीत यावं असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
पैशाच्या पाऊस पाडण्याच्या प्रकरणात सरकार तर्फे पोलिसांनी 'महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम 2013' नुसार गुन्हा दाखल केला आहे. धुळे पोलिसांनी पुढाकार घेत अंधश्रद्धा दूर करण्यासाठी पहिल्यांदाच अशा पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे. मध्यप्रदेश राज्यातील खंडवा येथील तिघांना धुळे जिल्ह्यातील सांगावी परिसरात पैशाचा पाऊस पाडल्याच अमिष दाखवण्यात आलं होतं. या ठिकाणी या तिघांची लूट करण्यात आली होती. त्यांना मारहाणी करण्यात आले होती. या घटनेमध्ये गोळीबार ही झाला होता. त्यानंतर जखमी मांत्रिकावरती धुळे येथे उपचार सुरू असून, या प्रकरणी पोलिसांनी मुख्य गुन्ह्यासोबत जादूटोणा अधिनियम 2013 नुसार गुन्हा दाखला केला आहे. पोलीस स्वतःच या गुन्हामध्ये फिर्यादी झालेले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या पाच आरोपींकडे फरार आरोपी आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांची चौकशी करायची असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांचा ताबा मागितला. त्यानुसार विशेष न्यायालयानेही त्या पाच आरोपींना 20 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपी शुभमन लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकर, भागवत सिंग, अक्षदीप सिंग, सलमान वोहरा आणि सुमीत वाघ अशी या पाच आरोपींची नावे आहेत. ते सर्व न्यायालयीन कोठडीत असल्याने पोलिसांनी न्यायालयाकडून त्यांचा ताबा मागितला. शुभमन लोणकरच्या ठावठिकाण्याबाबत चौकशी करायची असल्याने पोलिसांनी प्रवीण लोणकरची पोलिस कोठडी मागितली. तर उर्वरित आरोपींकडे शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्याबाबत आणि आर्थिक मदतीबाबत तपास करायचा असल्याने त्यांचा ताबा मागितला. बचावपक्षाच्या वकिलांनी या सर्व आरोपींची पोलिस कोठडी मागण्यासाठी कोणतीही नवी कारणे पोलिसांकडे नसल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. प्रवीण लोणकर मकोकाअंतर्गत कबुलीजबाब देण्यास तयार नाही, असा युक्तिवाद वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पाच आरोपींना 20 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
लोणावळा येथे चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लोणावळ्यातील बापदेव रोड परिसरात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास वॉकसाठी जाणाऱ्या महिलेचं मंगळसूत्र चोरून नेण्यात आले. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी पीडित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढले. या महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे असफल झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली झाले. सर्रासपणे लोणावळ्यात सुरू असलेल्या या चेन स्नॅचिंग घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणावळ्यात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि 'घड्याळ' चिन्हासंबंधी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. मंगळवारी हे प्रकरण सुनावणीसाठी द्विसदस्यीय खंडपीठापुढे सूचिबद्ध करण्यात आले होते. मात्र वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर पुढील सुनावणी 7 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व 'घड्याळ' चिन्हाचा फैसला आता नवीन वर्षात होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीत न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केले, असा दावा करीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अलीकडेच प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी लक्षवेधी ठरणार आहे.
महाराष्ट्रात 19 डिसेंबरपासून पुढील 10 दिवस कमाल आणि किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी नाताळला जाणवणारी तीव्र थंडी या वर्षी जाणवण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली. मात्र, वर्षाअखेरीस म्हणजे 29 डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होऊन नववर्षात पुन्हा थंडीची अपेक्षा करता येईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात थंडीची लाट किंवा थंडीची लाटसदृश्य स्थिती जाणवणाऱ्या ठिकाणांचे पहाटे साडेपाचचे किमान तापमान 5 ते 15 अंशांपर्यंत नोंदविण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रात भागानुसार कमी- अधिक प्रमाणात जाणवत असलेली थंडी आज टिकून राहील. नंतर तापमानात वाढ होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
सकाळी अकरा वाजता छगन भुजबळ यांची संघर्ष सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा नाशिकच्या जेजुरकर मळा येथे आयोजित करण्यात आली असून सभेच्या मंचावर भुजबळ नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने भुजबळ नाराज असल्याने ते नेमकं कोणाला आणि कसं लक्ष्य करणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.
विधान परिषदेच्या सभापती निवडीसाठी आज अर्ज दाखल करण्यात येतील. भाजपकडून प्राध्यापक आमदार राम शिंदेंना उमेदवार देण्यात आल्याने शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्येसह परभणीतील घटनेवरून विरोधक आक्रमक झाले असून या संदर्भात आज सभागृहात स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा होणार आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.