Maharashtra Breaking News LIVE : ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी जालन्यातील वडीगोद्री येथे आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे. तर पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला असून पेपरफुटीविरोधी कायदा लागू करण्यात आला. शुक्रवारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक घडामोडीची माहिती मिळवा फक्त एका क्लिकवर
सीईटी परीक्षा निकालात गोंधळ यासंदर्भात आम्ही राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. सकारात्मक चर्चा झाली. या सगळ्याची आन्सर शीट मिळावी. 54 चुका कशा झाल्या यावर आयुक्त राजीनामा देणार का? ऑब्जेक्शन घेण्यात पैसे कमवले जात आहेत. या विद्यार्थ्यांचे पैसे रिफंड मिळावेत. यावर उच्च शिक्षणमंत्री का बोलत नाहीत ? डीटीईचे डायरेक्टर भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे बोलतात, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
संविधानिक पदावर राहून एका समाजाचा आकस करणाऱ्या द्वेष बाळगणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांची हकालपट्टी करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी केली. ओबीसी मधील आरक्षणावरून सध्या राज्यामध्ये उपोषणांचे सत्र सुरू आहे अशातच मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केलेली आहे. छगन भुजबळ हे मंत्रिपदाच्या गोपनीयतेचा भंग करत आहेत. जातीयवादी पद्धतीने एखाद्या आंदोलना पाठीबा देत आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी असे ते म्हणाले.
नांदेडमधील भाजप नेत्या सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिलाय. सूर्यकांता पाटील या माजी केंद्रीय राज्यमंत्री आहेत. भाजपचं प्राथमिक सदस्यत्व आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचाही त्यांनी राजीनामा दिलाय. कोणतीही कटुता मनात न ठेवता आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात म्हंटलंय. दरम्यान त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत उत्सुकता आहे.
मराठेसुद्धा रस्त्यावर येतील आता, तुम्हाला खेटायचं आहे. आता तर नाईलाज आहे आमचा- जरांगे
दोन्ही बाजूने चर्चा होऊन मार्ग काढा; याचा कायद्यात विचार व्हावा- पंकजा मुंडे
ओबीसी आंदोलनातून खळबळजनक आरोप करण्यात आलाय. पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून त्यांचा बीडमध्ये पराभव झाला, असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलाय. तर छगन भुजबळ यांनीही या आरोपाला दुजोरा दिलाय.
दीड हजार ग्रामपंचायतींचा आम्हाला पाठिंबा आहे, असंही लक्ष्णम हाके यांनी यावेळी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, अनेक नेत्यांनी उपोषणस्थळी येऊन मला पाठिंबा दर्शविला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका, अशी मागणी त्यांनी शिष्टमंडळासमोर केली.
सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्री दाखल झाले आहेत...या शिष्टमंडळात भुजबळ, महाजन, सावे, सामंत, मुंडे, भुमरे आहेत...उपोषणस्थळी शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करत आहेत. तर यावेळी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी भूमिका सरकारची असल्याचं भुजबळांनी म्हटलंय...तसंच अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याची माहिती भुजबळांनी दिलीय...त्यामुळे हाके आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे...
ताडोबातल्या नयनतारा वाघिणीने सध्या सफारी करण्याऱ्या पर्यटकांना भुरळ घातली आहे...निमढेरा बफर झोन मधील नयनतारा वाघिणीचा पाण्यात प्रतिबिंब दिसणारा एक सुरेख व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे... वन्यजीवप्रेमी इंद्रनील मडावी यांनी हा व्हिडिओ चित्रित केलाय.. नयनतारा वाघीण आणि भोला वाघ हे भाऊ -बहीण पाणवठ्यावर विसावा घेत थोडी मस्ती करताय...
पंढरपुरात आषाढ वारी नियोजनाची बैठक पार पडली.. या बैठकीत 17 जुलै रोजी आषाढ वारी सोहळा होणार असल्याची जाहिर करण्यात आलं.. 7 जुलैपासून भाविकांना पांडुरंगाचं 24 तास दर्शन घेता येणार आहे.. या बैठकीत मानाच्या दहा पालखी प्रमुकांच्या शासकीय पूजेत बसवण्याबाबत चर्चा झाली नाही.. त्यामुळे पालखी प्रमुखांना शासकीय महापूजेत बसवण्याची परवानगी मिळण्याची शक्यता कमीच आहे..
सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरहून वडीगोद्रीकडे रवाना झालंय...थोड्याच वेळात शिष्टमंडळ हाकेंची भेट घेणार आहे...या शिष्टमंडळात भुजबळ, महाजन, सावे, सामंत, मुंडे, भुमरे आहेत...6 मंत्र्यांसह सरकारचे प्रतिनिधी आहेत...यावेळी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी भूमिका सरकारची असल्याचं भुजबळांनी म्हटलंय...तसंच अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याची माहिती भुजबळांनी दिलीय...त्यामुळे हाके आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे...
अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या आरोपींना, पोलिसांनी बेड्या ठोकल्यात...19 जून रोजी चोरट्यांनी दरोडा टाकत जवळपास 4 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला होता...दरम्यान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत आरोपींना अटक केली...
सोलापुरात भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांनी गोंधळ केलाय. भाजपाचे खासदार आणि सोलापूर निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोर हा गोंधळ झाला आहे. खासदार धनंजय महाडिक यांची सत्ता असेलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजपविरोधात काम केल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केलाय. मात्र जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी कार्यकर्त्यांना थांबवत वैयक्तिक म्हणणे मांडण्याची सूचना केली. लोकसभेच्या पराभवाचे चिंतन करण्यासाठी ही बैठक होतेय. चिंतन बैठकीवेळी खासदार धनंजय महाडिक, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे , माजी आमदार लक्ष्मण ढोबळे आदींची प्रमुख उपस्थिती आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दंड ठोठावण्यात आलाय...सुनावणीला सतत गैरहजर राहिल्यानं 3 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय...महाविकास आघाडी सरकरच्या काळात कोरोना असताना वीज दरवाढीविरुद्ध भाजपनं आंदोलन केलं होतं...त्या आंदोलनात बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केल्याचाही आरोप नार्वेकरांवर आहे...भाजपच्या 20 पदाधिकाऱ्यांविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरू असून, 8 जुलैच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश कोर्टाकडून जारी करण्यात आलेयत...
अमरावती खासदार कार्यालयाचा वाद टोकाला गेलाय. यशोमती ठाकूर आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. आमदर यशोमती ठाकूर यांनी कार्यालय ताब्यात घेण्याचा इशारा दिलाय. भाजप सरकारविरोधात यशोमती ठाकूर यांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयाचे कुलूप तोडलं. आम्हाला हे सरकार दुजाभावाची वागणूक देत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
शेतीसाठीच्या पाणीपट्टीत वाढ अन्यायकारक असून त्याविरोधात अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय...ही वाढीव पाणीपट्टी कमी करायला सरकारला भाग पाडणार, असा इशाराच पटोलेंनी दिलाय. विधानसभेत केवळ शेतकरी हाच केंद्रबिंदू असणार असल्याचं ते म्हणाले.
ठाण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.. या पावसामुळे ठाण्यातील सखल भागात पाणी साचलंय. वंदना डेपो परिसरात पाणी साचायला सुरुवात झालीये.. त्यामुळे ठाणे शहरातील रस्ते आणि रेल्वे सेवा मंदावलीये.. लोकसेवा 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरु आहे....
आरक्षणासंदर्भात भाजप खासदार उदयनराजेंनी रोखठोक भूमिका मांडलीय...जातनिहाय जनगणना करून वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाका...अशी भूमिका उदयनराजेंनी मांडलीय...मराठा आरक्षणप्रश्नी 23 मार्च 1994 चा अध्यादेश हा कळीचा मुद्दा आहे...त्यात मराठ्यांना डावलून माळी, धनगर, वंजारी असे सर्वांना आरक्षण देण्यात आलं... त्यामुळे सध्या जातीजातीत तेढ निर्माण झाला असून दिवसेंदिवस जाती जातीत दुफळी माजत असल्याचे उदयनराजे भोसलेंनी म्हटलंय...
प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध जिल्ह्यातून ओबीसी बांधव एकवटत आहे. नांदेड जिल्हयातूनही ओबीसी बांधवांचा मोठा पाठिंबा मिळतोय. हाके यांच्या आंदोलनात सामील होण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील भोकरमधून ओबीसी बांधव वडीगोद्रीला रवाना झाले. 25 गाडयांमधून ओबीसी बांधव वडीगोद्रीकडे निघालेत. काल नांदेडच्या कंधार, लोहा तालुक्यातून शेकडो गाड्यांचा ताफा वडीगोद्रीकडे रवाना झाला होता. आज नांदेडच्या भोकर तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव रवाना झाले आहेत.
ओबीसी नेते बबनराव तायवाडेंच्या टीकेला जरांगे पाटलांनी जोरदार उत्तर दिलंय. भुजबळांसोबत स्टेजवर असताना तुमची भाषा तुम्हाला लक्षात नाही का असा सवाल जरांगेंनी केलाय. जरांगेंची भाषा ओबीसी नेत्यांवर दिवसेंदिवस खालच्या स्तरावर जातेय अशी टीका तायवाडेंनी केली होती. त्यांची उंची काय असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर जरांगेंनी उत्तर दिलंय.
संभाजीनगर विमानतळाला छावणीचं स्वरुप आलं आहे. भुजबळ, ओबीसी नेत्यांसाठी विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून तगडा बंदोबस्त आहे. 3 पीआय, 4 एपीआय, 5 पीएसआय, दंगल नियंत्रण पथकाची 36 जवांनांची तुकडी, 15 कर्मचारी साध्या कपड्यात, 30 कर्मचा-यांसह मोठा बंदोबस्त तैनात
आमची एकही कुणबी नोंदी खोटी नाही...भुजबळांच्या सांगण्यावरून आमच्या नोंदी खोट्या ठरवू नका...नोंदी खोट्या ठरवणं सरकारला परवडणारं नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय...ओबीसी आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीत कुणबी नोंदी खोट्या असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता...त्यावरून जरांगेंनी भुजबळांवरही निशाणा साधलाय...तर चुकीचं प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा गुन्हेगार असल्याचं भुजबळांनी म्हटलंय...
शेतीच्या पाणीपट्टीत दहापट वाढ केल्याची माहिती नसल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय. पाणीपट्टीत वाढ झाली असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले.
राज्यातील शेतक-यांवर पाणीपट्टीचं सुलतानी संकट ओढावलंय...राज्याच्या जलसंपदा विभागाने शेतीच्या पाणीपट्टीत दहापट वाढ केलीय...यामुळे 500 रुपयांच्या जागी 5 हजार रुपये मोजावे लागणार आहेत...2018-19 साली बारमाही पिकांसाठी पाणीपट्टीचा दर हा स्थानिक करांसह वार्षिक एकरी 538 रुपये इतका होता...मात्र, आता नवीन दरवाढीनुसार हा दर बागायती शेतक-यांसाठी वार्षिक एकरी 5 हजार 443 रुपये इतका होणार आहे....एका झटक्यात झालेली ही दहापट दरवाढ बागायतदार शेतक-यांचे कंबरडे मोडणाराय...राज्यात ऊस आणि केळीसह बारमाही पिकांच्या क्षेत्राला याचा मोठा फटका बसणार आहे...जलसंपदा विभागाने 29 मार्च 2022 रोजी जलदराचे पुनर्विलोकन व सुधारणा करण्याच्या उद्देशाने एक अध्यादेश जारी केलाय...
पन्नास रुपये पासिंग दंड रद्द करावा या मागणीसाठी रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समिती आक्रमक झालीय. 25 जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौ-यावर आहेत. याच दिवशी रिक्षा आणि टॅक्सी एक दिवसीय संपावर जाण्याचा इशारा या समितीनं दिलाय. या संपात 16 हजार रिक्षा आणि टॅक्सी सहभागी होतील, असा दावाही या समितीनं केलाय.
वाशिम जिल्ह्यात पावसानं हजेरी लावलीय. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. वाशिमसह मानोरा तालुक्यात काही ठिकाणी पावासानं हजेरी लावली. या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाल्यानं दुबार पेरणीचं संकटही टळलंय. त्यामुळे शेतकरीराजा आनंदी झालाय.
राज्यात सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनांमुळे सरकारची चांगलीच कोंडी झालीय. आंदोलनकर्त्यांच्या भेटीसाठी वरिष्ठ मंत्र्यांची कसरत सुरुय. जालन्यातील वडी बुद्रुकमध्ये लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. दुसरीकडे पुण्यामध्ये ओबीसींच्या मागण्यांसाठी मंगेश ससाणे उपोषण करतायत. त्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. ससाणेंच्या उपोषणाची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याची टीका सुरू होताच त्यांचं उपोषण थांबवण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झाल्यायत. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि तर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे आज सकाळी 11 वाजता ससाणेंच्या भेटीसाठी येतायत. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही भेट होणारेय.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे दक्षिण नगरचे खासदार निलेश लंके आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत...मातोश्रीवर जाऊन लंके सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत...निवडणुकीत मदत केल्यामुळे ही आभार भेट असल्याचं बोललं जातंय...
भाजपनंच एकनाथ शिंदे यांचा गेम केला. शिवसेनेच्या सोबत राहून भाजपनं असं करणं योग्य नसल्याचं सांगत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपला घरचा आहेर दिला. विरोध असेल तिथं उमेदवार बदलला नाही. त्याच वेळी सहकारी पक्षांवर मात्र उमेदवार बदलण्यासाठी दबाव टाकला होता, असा आरोप करीत त्यांनी भाजपला आव्हान दिलंय.
उद्या मध्य आणि हार्बर या दोन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणारेय. मध्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बरवर सीएमएमटी ते चुनाभट्टी असा मेगाब्लॉक घेण्यात येणारेय. सकाळी 11 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणारेय. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येतोय.
चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 पूर्वी भरवल्यास शाळांवर कारवाई केली जाणार आहे...राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय...त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीविना सकाळी नऊपूर्वी भरणाऱ्या शाळांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली जाणार आहे...अनेक शाळा नियम करूनही सकाळी नऊपूर्वी शाळा भरवत असल्याने शिक्षण विभागाने हे पाऊल उचललंय...
शासकीय भरती परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय.. पेपरफुटीविरोधात कायदा लागू करण्यात आलाय.. मध्यरात्री केंद्राने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. ((या कायद्यानुसार 10 वर्षाचा तुरुंगवास आणि जास्तीत जास्त 1 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद आहे..तर परीक्षेला डमी उमेदवार दिल्यास 3 ते 5 वर्षांची शिक्षा आणि जास्तीत जास्त 1 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आलीये..)) देशात पेपरफुटीच्या घटना वाढल्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात संसदेने हा कायदा पुन्हा लागू केलाय..
आदित्य ठाकरे आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत...MHT CET परीक्षेच्या निकालात घोळ झाल्याप्रकरणी दुपारी 2 वाजता राज्यपालांना भेटणार आहेत...राज्यात अभियांत्रिकी प्रवेशासाठी झालेल्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या निकाला संदर्भात अनेक तक्रारी केल्या आहेत...या संपूर्ण परीक्षेत एकूण 54 चुका असून विद्यार्थ्यांना मिळालेल्या परसेंटाईल संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत ...त्यामुळे या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरे राज्यपालांची भेट घेणार आहेत...
ठाण्यातील गोखले रोडवरील अर्जुन टॉवरला आग लागलीय...अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत...या इमारतीत इमारतीत काही जण अडकल्याची भीती आहे...इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत...
आता एक धक्कादायक बातमी गुजरातच्या वडोदरामधून... इथला स्कूल व्हॅनमधून मुलं पडल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मुलांना शाळेत नेण्यासाठी स्कूल व्हॅन सोसायटीत आली होती. मुलांना घेऊन भरधाव व्हॅन जात असताना गाडीचा मागला दरवाजा अचानक उघडला गेला आणि त्यातून 2 मुली रस्त्यावर पडल्या. ही सारी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली.
ठाण्यात फुटबॉल टर्फवर इमारतीच्या पत्र्याची शेड कोसळून 6 जण जखमी झालेयत...जखमी झालेल्या 6 जणांवर ठाण्याच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत...ठाण्याच्या गावंडबाग परिसरात शुक्रवारी रात्री ही घटना घडलीय...फुटबॉल टर्फमध्ये 17 विद्यार्थी खेळत होते...त्यावेळी मुसळधार पावसामुळे रौनक पार्क फेस 2 च्या इमारतीवरील पत्र्याची शेड टर्फवर कोसळली...या दुर्घटनेत 15 वर्षांचे 6 खेळाडू जखमी झालेत...यातील 3 जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत...या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून, पत्र्याच्या शेडखाली विद्यार्थी अडकलेले दिसतायत...तातडीने त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं...याबाबत पोलिसांत तक्रारही करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करतायत...
महाविकास आघाडीबाबत सर्वात मोठी बातमी... महाविकास आघाडीतल्या एकजुटीसाठी दोन पावलं मागे आलो असं महत्त्वाचं विधान शरद पवारांनी केलीय.. आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या. मात्र महाविकास आघाडीची एकी राहवी यासाठी मी दोन पाऊल मागे आलो असं पवारांनी म्हटलंय. एकत्रित राहिलो म्हणून यश मिळालं. आतापासून विधानसभेच्या कामाला लागा असा संदेश शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय..
कुणबी दाखले खोटे असतील तर तपासू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती भुजबळांनी दिलीय. खोटी सर्टिफिकेट देणे आणि घेणे दोघेही दोषी असणार, त्याप्रमाणे कारवाई होणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं भुजबळांनी म्हटलंय. तर मराठा समाजाची एकही नोंद रद्द झाली तर तुम्हाला महागात पडेल असा इशाराच मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय..
हाकेंच्या राजकीय आंदोलनामागे भुजबळ असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. भुजबळांना राजकीय करिअरमधून उठवलं नाही तर बघा असा इशाराही जरांगेंनी भुजबळांना दिलाय.. मात्र कुणाची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारी जनता असते असं प्रत्युत्तर भुजबळांनी जरांगेंच्या इशा-यावर दिलंय. तर मी जनताच आहे असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केलाय..
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाकेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे...आज मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते हाके यांची दुपारी 2 वाजता भेट घेणार आहेत...काल राज्यातील ओबीसी नेत्यांसह हाकेंच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मुंबईत बैठक पार पडली.या बैठकीत 4 ते 5 मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून आज भुजबळांसोबत चर्चा करून उपोषणाबाबत योग्य निर्णय घेऊ असं हाके यांनी स्पष्ट केलंय...
मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी नेते आणि राज्य सरकारची बैठक पार पडली... या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.. तर ओबीसी नेत्यांच्या वतीने पंकजा मुंडे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अतुल सावे, संजय बनसोडे, गोपीचंद पडळकरही बैठकीला उपस्थित होते.. ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार तसंच मराठा समाजाप्रमाणे ओबीसींनाही तितकाच निधी दिला जाणार असल्याची माहिती भुजबळांनी या बैठकीनंतर दिली.. ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांना समोरासमोर बसवून तोडगा काढा अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली.. तसंच सगेसोयरेचा निर्णय घेण्यासाठी पावसाळी अधिवेशनात सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.