Elections In Maharashtra: नुकत्याच आटोपलेल्या तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर घेतलेल्या बैठकांमधील चर्चेसंदर्भातील माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकांच्या माध्यमातून मुंबई, ठाणे व पुणे स्वबळावर लढण्याबाबत भाजपची चाचपणी सुरु केली आहे. अमित शाह यांनीच राज्यातील नेत्यांना महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याबद्दलचे संकेत दिल्याचं वृत्त सुत्रांनी दिलं आहे.
शहांकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात घेण्यात आला. यानुसारच आता भाजपा स्वबळावर लढण्याची चाचपणी करत असल्याचं वृत्त विश्वसनीय सूत्रांनी दिलं आहे. या चाचपणीनंतर आणि पक्षांतर्गत चर्चेनंतर भाजपाने खरोखरच स्वबळाचा नारा दिल्यास मुंबई - ठाण्यात भाजप विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना तर पुण्यात भाजप विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी अशा लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला. यामध्ये पक्षाची ताकद किती आणि कुठे आहे यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. भाजपाची ही चाचपणी सध्या प्राथमिक स्तरावर सुरु असून युतीमधील इतर पक्षही प्लॅन बीअंतर्गत अशी तयारी करत असल्याचीही चर्चा आहे.
राज्य निवडणूक आयोगाने अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले आहेत. सध्याच्या 27 महानगरपालिकांसह इचलकरंजी व जालनातील दोन नव्याने निर्माण झालेल्या महानगरपालिका आणि पंचायत पातळीपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी (मविआ) सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
सत्ताधाऱ्यांपैकी भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार की स्वबळावर यासंदर्भातील गूढ अमित शाहांच्या नव्या संकेतानंतर अधिक वाढलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांमध्येही आद्याप या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसंदर्भात मोठ्या स्तरावर हलचाली दिसत नाहीयेत. पक्षपातळीवर बैठका, दौरे आणि आढावा बैठकींना सुरुवात झाली असली तरी महाविकास आघाडीमधून अद्याप काही ठोस घडल्याचं दिसत नाही. युतीमधील पक्ष स्वबळावर लढले तर महाविकास आघाडीही वेगळा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजपा नेमका काय आणि कसा निर्णय घेणार यावर आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका कशा होणार हे अवलंबून आहे.