Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना अखेर उपरती झालीय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मानसिकतेचा विचार करा असं विधान नामदेवशास्त्रींनी केलं होतं. मात्र आता ते विधान अजाणतेपणातून केल्याचं नामदेवशास्त्रींनी म्हटलंय. तर आपण देशमुख कुटुंबाच्या पाठिशी असल्याचंही शास्त्रींनी सांगितलंय
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं. या हत्येचा सर्वच स्तरातून निषेध होत असताना भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रींनी एक संताप आणणारी प्रतिक्रीया देत धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला होता. देशमुखांची हत्या मारेकऱ्यांनी का केली? मारेकऱ्यांची मानसिकता माध्यमांनी का दाखवली नाही? असा धक्कादायक सवाल करत शास्त्रींनी मारेकऱ्यांना एकप्रकारे पाठिशीच घातलं होतं. नामदेवशास्त्रींच्या विधानानंतर राज्यभरातून नामदेवशास्त्रींवर टीकेची झोड उठवण्यात आली. धनंजय मुंडेंनी भगवान गडावर जाऊन नामदेवशास्त्रींची भेट घेतल्यानंतर शास्त्रींनी हे विधान केलं होतं. मात्र आता संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर नामदेव शास्त्रींनी अखेर उपरती आलीय.
नामदेव शास्त्रींनी पश्चाताप व्यक्त करत तेव्हा केलेलं विधान अजाणतेपणातून केलं असल्याचं म्हटलं आहे. तसंच भगवानगड संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणीही महंत नामदेव शास्त्रींनी केली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी पहिल्या दिवशी आपल्याला पूर्वकल्पना नव्हती. धनंजय देशमुख ज्यावेळी गडावर आले त्यावेळी त्यांनी मला त्याची जाण करून दिली. धनंजय देशमुख यांनी माझी भेट घेतल्यानंतर माझी भावना बदलली. भगवानगड हा देशमुख कुटुंबाच्या मागे आहे. लोकांनी ही गैरसमज करू नये. निश्चितच मला जाण झाले आहे. न्यायालयाने देखील हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालून देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अस महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटल आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे कुख्यात गुन्हेगार आहे. हे माहित असूनही नामदेवशास्त्रींनी त्यांच्या समर्थनाची घेतलेली भूमिका ही संताप आणणारी होती. मात्र उशिरा का असेना नामदेवशास्त्रींना उपरती आलीय. त्यामुळे देर आए दुरुस्त आए असंच नामदेवश्स्त्रींबाबत म्हणावं लागेल. त्यामुळे इथून पुढं तरी एखाद्या प्रकरणात भूमिका घेताना नामदेवशांस्त्री एकदा नाही तर शंभर वेळा विचार करतील एवढं मात्र नक्की