Maharashtra Weather News : हवामान विभागानं जारी केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रातील कोकण आणि उत्तर भाग व्यापल्यानंतर आता थेट मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र व्यापत असून, पुढच्या 24 तासांमध्ये हेच वारे विदर्भ गाठणार असून, तेथील काही भागांना पाऊस झोडपणार आहे. एकिकडे मुंबई आणि पुण्यात मान्सूननं विश्रांती घेतलेली असतानाच दुसरीकडे मात्र आता मराठवाडा आणि विदर्भामध्ये मान्सूनचा प्रभाव पाहायला मिळणार आहे.
वाऱ्यांचा एकंदर वेग आणि मान्सूनची तीव्रता पाहता पुढील 24 तासांसाठी राज्याच्या मराठवाडा आणि विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर आभाळ दाटून येत इथंही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तिथं पावसाला कोकण आणि गोवासुद्धा अपवाद ठरणार नसून हवामान स्थिती काहीही असली तरीही या भागांमध्ये मात्र पुढचे पाच दिवस चांगल्या पावसाची हजेरी असेल. तर, गुरुवारी अमरावती भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसह एकूण 6 जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई शहरासह, ठाणे पालघर आणि उपनगरीय भागांमध्ये पुढील 24 तासांत हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, वातावरणात आर्द्रता वाढल्यामुळं मुंबईतील नागरिकांना काही प्रमाणात उकाडाही सहन करावा लागणार आहे.
हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावरून येणारा मान्सूनचा दुसरा प्रवाह पूर्व भारतमार्गे सिक्कीममध्ये येत्या एक-दोन दिवसांत प्रवेश करण्यास सज्ज आहे. पस्तूस्थिती पाहचा सध्या महाराष्ट्राच्या 45 टक्के भागावर मान्सून व्यापला असून, आता तो विदर्भात आपला मुक्काम वाढवत आहे.
विदर्भ क्षेत्र व्यापल्यानंतर महाराष्ट्रात 30 मे पासून पुढं पुढील 5 ते 6 दिवस या मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावत त्यांचा पुढील प्रवास अतिशय धीम्या गतीनं होईल. त्यामुळं पावसाची ये-जा पाहायला मिळू शकते. दरम्यान, उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात सक्रिय असणआरं कमी दाबाचं क्षेत्र धीम्या गतीनं पुढे सरकत असून, मान्सून गंगेच्या पश्चिम बंगालमधील क्षेत्रासह, सिक्कीम आणि ओडिशामधील भागांमध्ये प्रवेश करेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.