Kokan Railway: कोकण रेल्वे म्हणजे चाकरमान्यांसाठी लाइफलाइन आहे. पण कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणार आहे. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अलीकडेच संमती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची संमती असल्याचे पत्र लिहिले आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वेचे स्वत्रंत अस्तित्व टिकवण्यासाठी विलीनीकरणानंतर भारतीय रेल्वेला हस्तांतरित केलेल्या रेल्वे मार्गांसाठी "कोकण रेल्वे" हे नाव कायम ठेवण्यात यावे अशी विनंतीदेखील त्यांनी केली आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना 1990 मध्ये पश्चिम घाटाच्या आव्हानात्मक भूभागावर रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी करण्यात आली. महाराष्ट्रातील रोहा ते केरळमधील मंगलोर पर्यंत पसरलेल्या प्रदेशात रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण आणि बांधकाम आणि रेल्वे सेवांचे संचालन करण्याची जबाबदारी या कॉर्पोरेशनवर सोपवण्यात आली होती. सुरुवातीला, त्याच्या भागधारक रचनेत भारत सरकार (51%), महाराष्ट्र (22%), कर्नाटक (15%), गोवा आणि केरळ (प्रत्येकी 6%) राज्यांचा समावेश होता. नंतर 9 नोव्हेंबर 2011 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्याच्या भांडवल रचनेची पुनर्रचना करण्यात आली.
महामंडळाने महाराष्ट्रातील रोहा आणि केरळमधील मंगलोर दरम्यान रेल्वे मार्गाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण केले. सध्या या मार्गावर कोकण रेल्वेच्या विशेष सेवादेखील धावत आहेत. महाराष्ट्र सरकारने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर भागधारक राज्यांनी देखील या विलीनीकरणासाठी त्यांची संमती दिली आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची संमती कळवताना मला आनंद होत आहे, ज्यासाठी महाराष्ट्राला 396.5424 कोटी रुपये परतफेड करावी लागेल, जे पूर्वी राज्याच्या या प्रकल्पामधील वाटा म्हणून महामंडळाला पाठवले गेले होते. याव्यतिरिक्त, विलीनीकरणानंतर भारतीय रेल्वेला हस्तांतरित केलेल्या रेल्वे मार्गासाठी "कोकण रेल्वे" हे नाव कायम ठेवण्यात यावे, कारण त्यांच्या महत्त्वपूर्ण प्रादेशिक वारशाची दखल घेतली जाईल.
वर उल्लेख केल्याप्रमाणे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाला सूचना द्याव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.