वांद्र्यातील पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून सभागृहात दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार वरूण सरदेसाईंनी पुनर्विकासाचा मुद्दा रखडल्याची लक्षवेधी सभागृहात मांडली होती. दरम्यान यानंतर मंत्री शंभूराज देसाईंनी दिलेल्या उत्तरावरून वरूण सरदेसाई चांगलेच आक्रमक झालेत. पत्र पत्र काय खेळता असा
संतप्त सवाल त्यांनी शंभूराज देसाईंना केला. दरम्यान यानंतर शंभूराज देसाईंनी देखील वरूण सरदेसाईंवर पलटवार केला.
किती दिवस पत्र-पत्र खेळणार असा सवाल वरुण सरदेसाईंनी विचारला असता, तुम्ही काय केलं? एकदाही पाठपुरावा केलेला नाही असं शंभूराज देसाई म्हणाले.
पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून वरूण सरदेसाई आणि शंभूराज देसाई यांच्यात चांगलीच जुंपली होती. दरम्यान नंतर या वादात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी देखील उडी घेतली. वरूण सरदेसाईंनी केलेल्या विधानानंतर गुलाबराव पाटलांनी देखील त्यांच्यावर सडकून टीका केली.
जन्मताच हे हुशार होऊन आले होते का? तुमच्यापेक्षा मला जास्त बोलता येतं असं गुलाबराव पाटील म्हणाले.
सभागृहात झालेल्या खडाजंगीनंतर वरूण सरदेसाई आणि आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केलीय. पक्ष न बघता मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. तर मतदारसंघातील प्रश्न घेऊन येतो, त्याचं राजकारण कशाला करता
असा सवाल वरूण सरदेसाईंनी उपस्थित केला आहे.
पक्ष न बघता त्यांनी उत्तर दिलं पाहिजे, तसं होत नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तर वरुण सरदेसाई यांनी राजकारण डोळ्यासमोर ठेवून वक्तव्य करणं अपेक्षित नाहीत असं म्हटलं आहे.
मुंबई वांद्रे परिसरात 42 एकर जमीन डिफेन्स लँड संरक्षण विभागाच्या मालकीची असल्यामुळे 9483 झोपड्यांचे पुनर्वसन रखडलं आहे. या संदर्भातली लक्षवेधी वरूण सरदेसाईंनी मांडली होती. दरम्यान याच मुद्द्यावरून दोन्ही शिवसेनेचे नेते आमनेसामने आले होते.