Maharashtra Politics : सत्तेच्या सारीपाटात कोण कधी केव्हा वरचढ ठरेल हे सांगता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात देखील तेच बघायला मिळत आहे. 20 ते 25 वर्ष कोल्हापूरच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणारे सतेज उर्फ बंटी पाटील जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडलेत. स्वतः बंटी पाटील यांनीच या बदललेल्या राजकीय परिस्थितीची कबुली दिली आहे.
जिल्ह्याच्या महत्वाच्या सत्ता केंद्रांवर बंटी पाटील आणि राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकहाती सत्ता होती. गोकुळच्या सत्तेतही दोन्ही नेते एकत्रच आहेत. मात्र बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे बंटी पाटील आणि हसन मुश्रीफांची वाट वेगळी झाली. तेव्हापासूनच बंटी पाटील यांच्या जिल्ह्याच्या राजकारणात घेरण्याची विरोधकांची रणनिती सुरू आहे. त्यामुळेच एकाकी पडल्याची भावना सतेज पाटील यांनी बोलून दाखवली. सतेज पाटील यांचे जिल्ह्याच्या राजकारणातले मित्र मंत्री हसन मुश्रीफ यांना महायुतीधर्म पाळावा लागत असल्याने ते शिवसेना आणि भाजपसोबत असल्याचं पाहायला मिळतंय. बंटी पाटील यांच्या या एकाकी पडल्याचा भावनेनंतर मुश्रीफ यांनी पाटील यांना मित्रत्वाचा सल्ला दिला.
सतेज पाटील यांच्या कोंडीची सुरूवात झाली ती विधानसभा निवडणुकीपासूनच. त्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेलतत. कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली..शेवटच्या दिवशी बंटी पाटलांची मोठी राजकीय कोंडी झाली. त्यावेळी त्यांचा झालेला संताप महाराष्ट्राने पाहीला. आणि या राजकीय कोंडीनंतर कार्यकर्त्यांसमोर अश्रूंना वाट मोकळी करून देणारे बंटीपाटीलही महाराष्ट्राने पाहिले आहेत.
सध्या जिल्ह्याच्या राजकारणात येनकेन प्रकारे सतेज पाटील यांना घेरण्याची रणनीती विरोधकांकडून आखली जातेय. त्याचा प्रत्येयही बंटी पाटील यांना आल्याने त्यांनी कार्यकर्त्यांसमोर एकाकी पणाची भावना मांडली. आता विरोधकांचं हे चक्रव्हुह बंटी पाटील कसं भेदणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.