BMC Asks These Mumbai To Shift: मुंबईमध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील काही दिवसांपासून पहाटे आणि रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाळ्यात डोंगरावरून दरड कोसळणे, पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन मुंबईमधील डोंगराळ भागात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबईमध्ये दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये विक्रोळी पार्क साईट, विक्रोळी (पश्चिम) आणि घाटकोपर (पश्चिम) भागातील वर्षानगर, रामनगर, संजय गांधी नगर, राहुल नगर, गणेश नगर, खंडोबा टेकडी, आझाद नगर, सोनिया गांधी नगर, प्रेम नगर व आनंद नगर या ठिकाणींचा समावेश होतो. या सर्व ठिकाणी डोंगराळ परिसर असून इथे मोठ्या प्रमाणावर झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. डोंगराच्या उताराशी असलेल्या या झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने लोक वास्तव्यास आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे डोंगराळ भागात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. दरवर्षी मुंबईमध्ये पावसामुळे भिंत खचणे, पडझड यासारख्या वेगवेगळ्या दुर्घटनांमुळे विविध ठिकाणी लोकांना प्राण गमवावे लागल्याचं पाहायला मिळतं. हाच धोका टाळण्यासाठी आता महानगरपालिकेनेचे डोंगराच्या पायथ्याशी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुंबईकरांना स्थलांतरीत होण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, एन विभाग कार्यालयाने वर उल्लेख केलेल्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना सावधानतेच्या सूचना / नोटीस आधीच दिल्या आहेत. तरीही स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाशांनी स्वत:च्या जबाबदारीवर तेथे वास्तव्य करावे. नैसर्गिक आपत्तीमुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास मुंबई महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे ‘एन’ विभागाचे सहायक आयुक्तांनी कळविले आहे.
पावसाळ्यादरम्यान दरडी कोसळण्याची, डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची, तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात. विक्रोळी पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) आणि घाटकोपर (पश्चिम) भागातील वर्षानगर, रामनगर, संजय गांधी नगर, राहुल नगर, गणेश नगर, खंडोबा टेकडी, आझाद नगर, सोनिया गांधी नगर, प्रेम नगर व आनंद नगर या भागातील धोकादायक इमारतींना / झोपड्यांना एन विभाग कार्यालयातर्फे सावधानतेच्या सूचना / नोटीस आधीच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून संबंधित भागातील स्थानिक रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.