Education News : स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांना या स्पर्धेशी एकरुप करत त्यांना शैक्षणिक स्तरावर प्रगती करण्याचा वाव देण्यासाठी सर्वच शिक्षण मंडळं प्रयत्नशील दिसतात. त्यातच आता महाराष्ट्र शासनही मागे राहिलेलं नाही. नुकतंच राज्य शासनानं शालेय शिक्षणासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेत राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये अर्थात SSC बोर्डाच्या शाळांमध्ये आता सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं.
यंदाच्या वर्षी फक्त पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलीसाठी नवा पॅटर्न लागू होणार असून, पुढील वर्षापासून दुसरी, तिसरी आणि चौथीच्या वर्गासाठी सीबीएसई पॅटर्न लागू होणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्य शासनाच्या या निर्णयानंतर यंदाच्या वर्षी फक्त इयत्ता पहिलीच्याच अभ्यासक्रमात हा बदल लागू करण्यात येणार असून सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदाच बदल लागू केल्यास आकलनास अडचणी उदभवतील. याच कारणास्तव येत्या दोन वर्षांमध्ये पूर्णपणे सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्यात येणार असल्याचं भुसे यांनी स्पष्ट केलं.
CBSE पॅटर्नमध्ये 30 टक्क्यांपर्यंतची सवलत असून यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि मराठी या विषयांना प्राधान्य देत अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. इतकंच नव्हे, तर सीबीएसईची पुस्तकंसुद्धा मराठीतच तयार केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक राहणार असून मराठीची डिग्री गरजेची असेल असंही त्यांनी सूचित केलं. दरम्यान या निर्णयानंतर कोणत्याही प्रकारची फी वाढ होणार नाही हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 4 हजार 860 शिक्षकांच्या भरतीसंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामध्ये दिव्यांग विशेष शिक्षकांच्या 218 पदांचाही समावेश आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत प्रत्यक्ष पदस्थापना करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली. राज्यातील दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंदर्भात आ. अॅड. निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.