Maharashtra Vidhan Sabha Election: 'मत चोरी' म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच मतदार याद्यांमधील गोंधळाबद्दल धक्कादायक खुलासे करताना भारतीय जनता पार्टीने निवडणुकीमध्ये फेरफार केल्याचा गंभीर आरोप केला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीने ही मत चोरल्याचा आरोप राहुल गांधींनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली असून यावरुन सोमवारी दिल्लीत विरोधी पक्षाच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाही नेला. एकीकडे हा विषय राष्ट्रीय स्तरावर तापलेला असतानाच आता राज्यातील महाविकास आघाडीनेही विधानसभा मतदानाआधी मतदार याद्यांमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केलाय.
विधानसभा निकालांच्या आधीच महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला या संभाव्य छेडछाडीसंदर्भातील आक्षेप नोंदवणारं पत्र लिहीलं होतं. महाविकास आघाडीने भाजपवर गंभीर आरोप करणारे पत्र पाठवलं होतं त्यावर मविआच्या तीन प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मतदार याद्यांमध्ये छेडछाड करण्यासाठी भाजपकडे फॉर्म 6 चा डेटाबेस देखील उपलब्ध होता असा आरोप करण्यात आळा आहे.
"भाजपच्या पदाधिकारी आणि आमदारांनी मतदारयादीत छेडछाड करताना आपल्या बाजूने मतदान करू शकतील असे लोक आधीच हेरले होते. आपल्या बाजूने मतदान करू शकणारी नावे हिरव्या शाईने ठळक केली तर बाजूने मतदान न करणारी लाल रंगात ठळक करण्यात आली होती. आणि ती यादी थेट एका खाजगी सर्व्हर अपलोड करण्यात आली आणि नंतर मोबाइल अॅप्लिकेशन मधे अपलोड करण्यात आली," असं या पत्रात म्हटलं आहे.
"याच यंत्रणेमुळे त्यांना आवश्यक असणारी मतदारांची नावे मतदार याद्यात राहिली आणि बाकी नावे आपोआप डिलीट झाली. केलेले बदल कुणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 हजार नावे वाढवण्यात आली. वाढवण्यात आलेली नाव ही पूर्णपणे बनावट आणि फसवी होती," असंही या पत्रात म्हटलं आहे.
या पत्रावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार संजय राऊतांनी स्वाक्षरी केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसकडून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची स्वाक्षरी आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी हे पत्र ॲाक्टोबर महिन्यात लिहिले होते. महाविकास आघाडीकडून संशय असणाऱ्या मतदारसंघाची मतदार याद्यांची माहिती निवडणूक आयोगाकडून मागण्यात आली होती. मात्र आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही. माहविकास आघाडीने महाराष्ट्रातील कोणत्या विधानसभा मतदारसंघांबद्दल त्यांना शंका आहे याची यादीच जारी केली आहे. या यादीत कोणते मतदारसंघ आहेत पाहूयात...
1) शिर्डी
2) चंद्रपूर
3) आर्वी
4) कामठी
5) कोथरूड
6) गोंदिया
7) अकोला पूर्व
8) चिखली
9) नागपूर
10) कणकवली
11) खामगाव
12) चिमूर
13) धामणगाव रेल्वे
1. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 'मत चोरी'चा आरोप कोणी केला आहे?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीने भारतीय जनता पक्षाने (भाजपा) मतदार यादीत छेडछाड करून 'मत चोरी' केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर महाविकास आघाडीनेही (मविआ) राज्यातील मतदार यादीत छेडछाड झाल्याचा दावा केला आहे.
2. या आरोपांचे स्वरूप काय आहे?
राहुल गांधी आणि महाविकास आघाडीने असा दावा केला आहे की, भाजपाने मतदार यादीत फेरफार करून बनावट आणि फसवी नावे समाविष्ट केली. यामुळे त्यांच्या बाजूने मतदान करणारी नावे यादीत राहिली, तर इतर नावे हटवली गेली.
3. महाविकास आघाडीने काय पावले उचलली?
महाविकास आघाडीने ऑक्टोबर 2024 मध्ये निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदार यादीतील संभाव्य छेडछाडीबाबत आक्षेप नोंदवला. त्यांनी संशयास्पद मतदारसंघांच्या मतदार यादींची माहिती मागितली, परंतु निवडणूक आयोगाने ही माहिती अद्याप दिलेली नाही.
4. भाजपाकडे फॉर्म 6 चा डेटाबेस कसा उपलब्ध होता?
महाविकास आघाडीच्या पत्रात असा आरोप आहे की, भाजपाकडे मतदार यादीत बदल करण्यासाठी फॉर्म 6 (नवीन मतदार नोंदणीसाठीचा फॉर्म) चा डेटाबेस उपलब्ध होता, ज्याचा वापर करून त्यांनी मतदार यादीत हेरफेर केली.