Vidhansabha Opposition Leader: महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीत यासंदर्भात ठरवा संमत झाला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे हे शिफारसपत्र पाठवण्यात आले.
-- भास्कर जाधव 1982 पासून शिवसेनेत
-- 1995 ते 2004 दरम्यान चिपळूणमधून दोन वेळा आमदार
-- 2004 - शिवसेनेला सोडचिठ्ठी
-- 2006 - महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य
-- 2009 - राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवत विजयी
-- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात नगरविकासमंत्री
-- 2013 - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
-- 2014 - महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून विजयी
-- 2019 निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश
-- 2019 आणि 2024 निवडणुकीत शिवसेनेचे आमदार
भास्कर जाधव कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव आमदार आहेत. भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपुर्वी रंगली होती. त्याला कारणही तसंच होतं. क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही. हे माझं दुर्दैव असल्याची खंत भास्कर जाधवांनी व्यक्त केल्याने चर्चांना उधाण आले होते. दरम्यान त्यांना विरोधी पक्षनेते पद देऊन योग्य सन्मान राखला गेल्याचे आता म्हटले जात आहे.
गेले काही दिवस एक प्रश्न विचारला जात होता. आज शिवसेनेने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. पुढची वाटचाल आम्ही करणार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. एकत्रित निर्णय घेऊन आम्ही पुढे जाऊ. येत्या अर्थसंकल्प आधी विरोधी पक्षनेता बसवला पाहिजे असे ते म्हणाले. भाजपला आदित्यचं नाव हवं होतं हे जर समजलं असतं तर बरं झालं असतं. घराणेशाही त्यांना चालतं हे समजलं असतं, असा चिमटा त्यांनी भाजपला काढला.केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली. याही बाबतीत मुख्यमंत्री शिक्षा करतील असं बोलले आहेत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरही त्यांनी भाष्य केले. ठीक आहे बघूया अजून किती विकेट जातायत. माझ्या आमदारांनी आणि इतर पक्षातील आमदारांनीदेखील मत व्यक्त केलं आहे. जे काही व्हिडीओ किंवा फोटो काल आले ते सरकारकडे आले होते की नाही? मुख्यमंत्री पारदर्शक काम करत असतील तर स्वागत आहे. महाराष्ट्रच्या जनतेला वीट आला आहे.त्यांना व्यथा सोडवणार सरकार हवं असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री गृहमंत्री देखील आहेत.दोन तीन महिने ही घटना गाजत आहे. धनंजय मुंडेंनी तब्येतीच कारण दिलंय, त्याची कोणीही चेष्टा करू नये. माझ्यातले जे गेले त्यांनी माझ्या प्रकृतीची चेष्टा केली पण तब्येतीच कारण मुंडे बोलतात. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला गेल्याचे दादा बोलतात. राजीनामा नेमका काय कारणाने दिला गेला यांचही उत्तर दिलं गेलं पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.