Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मान्सून मोठ्या सुट्टीवर; कोकणापासून विदर्भापर्यंत कसं असेल हवामान? शेतकऱ्यांसह सामान्यांसाठी महत्त्वाचा इशारा

Maharashtra Weather News : दणक्यात एंट्री करणाऱ्या मान्सूनच्या प्रगतीच्या वाटेत आता अडथळा निर्माण झाला असून, राज्यातील शेतकरी वर्गाची चिंता मात्र यामुळं वाढली आहे.   

मान्सून मोठ्या सुट्टीवर; कोकणापासून विदर्भापर्यंत कसं असेल हवामान? शेतकऱ्यांसह सामान्यांसाठी महत्त्वाचा इशारा

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल झालेल्या पावसानं आता खरे तालरंग दाखवण्यास सुरुवात केली असून, आगमानंतर काही दिवसांतच हे मोसमी वारे दडी मारून बसले आहेत. राज्यातील काही निवडक भाग वगळता उर्वरित बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावलेली नाही असंच चित्र गेल्या 24 तासांमध्ये पाहायला मिळालं. 

कोकण, विदर्भात सरीवर सरी...

पावसानं मोठ्या सुट्टीवर जाण्याचा बेत आखला असला तरीही कोकण मात्र यास अपवाद ठरत असून तळकोकणापासून ते रत्नागिरीपर्यंत पावसाच्या सरींचीच हजेरी  पाहायला मिळत आहे. विदर्भातही पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, त्या धर्तीवर या भागांसाठी हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यानच्या काळात उर्वरित राज्यात मात्र तापमानात चढ- उतार होताना दिसेल असाही इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. विदर्भात प्रामुख्यानं वर्धा, अमरावती, यवतमाळ या भागांमध्ये पावसाची हजेरी असेल. 

उत्तर प्रदेशापासून विदर्भाच्या पूर्वेपर्यंत सक्रिय असणारा कमी दाबाचा तीव्र पट्टा आता विरळ झाला असून, त्यामुळं राज्यातील तापमानाच चढ उतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागानं पुढील 24 तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी वगळल्या, तर उष्मा जाणवण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यानच्या काळात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह एखादी सर बरसू शकते असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

पावसात आणखी किती दिवसांची घट?

यंदाच्या वर्षी विक्रमी कामगिरी करणाऱ्या नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी केरळात तुलनेनं बरीच आधी हजेरी लावली होती. असं असलं तरीही अरबी समुद्रातूनच प्रवाह कमी झाल्यानं मान्सूनचा वेग मंदावला आणि हे मोसमी वारे मोठ्या सुट्टीवर गेले. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली असून, 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

दरम्यानच्या काळात पश्चिम किनारपट्टीसह राज्यातील काही भागांतच हलका पाऊस पडू शकतो. बहुतांश जिल्हे मात्र कोरडेच राहतील असं हवामान विभागासह कृषी विभागानंही सूचित केलं असून, बदललेल्या या वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ होईल. या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असंही आवाहन कृषी विभागाकडून केलं जात आहे. 

Read More