Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मुंबई, कोकणात दमदार आगमनानंतर मान्सूनला ब्रेक; विदर्भावर मात्र अस्मानी सावट, धाराशिवमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

Maharashtra Weather News : राज्यातील हवामानात महत्त्वाचे बदल होण्यास सुरुवात झाली असून, धुमाकूळ घालत राज्यात आलेल्या मान्सूननं आता अचानकच काही भागांत उसंत घेतली आहे.   

मुंबई, कोकणात दमदार आगमनानंतर मान्सूनला ब्रेक; विदर्भावर मात्र अस्मानी सावट, धाराशिवमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

Maharashtra Weather News : यंदाच्या वर्षी सर्व विक्रम मोडित काढत केरळ, तळ कोकण आणि मुंबईत मे महिन्यात धडकलेल्या मान्सूननं सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये धरलेला जोर पाहता हा पाऊस काही इतक्यात पाठ सोडत नाही, असंच वाटत होतं. मात्र वाऱ्याची दिशा बदलली आणि पर्यायी राज्यातील हवामानसुद्धा. मागील 24 तासांपासून राज्याच्या कोकण किनारपट्टी भागांसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर तुलनेनं कमी असल्याचं पाहायला मिळालं. तर, समुद्रही शांत असल्याची बाब निदर्शनास आली. 

तिथं धाराशिव जिल्ह्याला मात्र प्रचंड पावसानं झोडपलं. कळंब तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यानं तिथं अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं. 

पुढील 24 तास पावसाचे की...? 

हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण कोकणातील जिल्ह्यांसह दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान सोसाट्याचा वारा वाहणार असून, वाऱ्याचा वेग ताशी 40-50 किमी इतका असेल.  

मराठवाडा आणि विदर्भामध्ये सध्या पर्जन्यमान अधिक राहणार असून, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्रतवली आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 50-60 किमी इतका असेल. 

मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघरमध्ये मात्र पावसाचा जोर ओसरत असल्याचं पाहायला मिळणार असून, यादरम्यान हवेतील आर्द्रता नागरिकांच्या अडचणींमध्ये अधिक भर टाकताना दिसेल. मुंबई आणि कोकणात तापमानात काही अंशांनी वाढ अपेक्षित असून, मान्सून या भागांमध्ये काही दिवस बेतानंच बरसताना दिसेल. दरम्यान मुंबईकरांना प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारांचा सामना करावा लागणार असल्यानं हवामानातील हा बदल असह्य होणार आहे. 

देशभरात कमीजास्त प्रमाणात पावसाची हजेरी 

सध्या देश स्तरावर दक्षिण भारतात प्रचंड पाऊस सुरू असून तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यात वादळी वा-यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक घरांना भेगा पडल्या असून अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळे पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालेय. तर, अतीव उत्तरेकडे जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये मुसळधार पाऊस बरसला असून अनेक ठिकाणी तुफान गारपीटही झाली आहे. तर, हिमाचलच्या काही भागांमध्येही पावसानं हजेरी लावली आहे. 

 

Read More