Maharashtra Weather News : हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या कोकण, घाटमाथा, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर काही अंशी ओसरला आहे. त्यातच पावसानं काहीशी उघडीप दिल्यामुळं विदर्भात कमाल तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान पुढील 24 तासांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. तर, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विजांच्या कडडाटासह येणाऱ्य़ा पावसाच्या सरींची तुफान हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशाच्या बिहार, उत्तर प्रदेश क्षेत्रावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, राजस्थान आणि नजीकच्या भागांवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाच्या पट्ट्यासाठी पूरक स्थिती असल्यामुळं देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
मुंबईला मंगळवारी झोडपून काढणाऱ्या पावसाने बुधवारी पुन्हा उसंत घेतली. पावसाची ही विश्रांती शनिवारपर्यंत कायम राहणार असून दरमयानच्या काळात शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवत आकाश साधारणपणे ढगाळ राहील असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. शहराचं कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32°C आणि 26°C च्या दरम्यान असेल.
मुंबईत पावसानं विश्रांती घेतली असली तरीही शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने दमदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळं पाणीपातळीत झपाट्याने वाढ होतेय. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सातही धरणांत एकूण 80.32 टक्के पाणीसाठा झाला असून ही दिलासादायक बाब ठरत आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 16, 2025
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया.https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/ne2G1ef0uQ
राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या किंचित सरी कोसळतील, तर शनिवारनंतर हवामानात बदल होतील. त्यानंतर पावसाचा जोर वाढेल आणि जुलैअखेरीस मुंबईसह राज्यात बऱ्यापैकी पाऊस होईल, असे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.