Maharashtra Weather News : केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये सध्या तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. मध्य भारतासह दक्षिण भारतापर्यंत तापमानवाढ आणि किनारपट्टी क्षेत्रांमध्ये कमी दाबाच्या वाऱ्यांमुळं हवामानाची संमिश्र स्थिती दिसून येत आहे. त्यातच देशाच्या उत्तरेकडे मात्र पाऊस आणि हिमवर्षावाचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. फक्त महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास राज्यात पुन्हा एकदा तापमानवाढीस सुरुवात झाली असून, हा आकडा चाळीशीपार जाताना दिसत आहे.
मागील 24 तासांमध्ये राज्यात सोलापूर आणि अकोला इथं पारा 40 अंशांवर पोहोचला असून, राज्याच्या एकंदर सरासरी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्यातील किनारपट्टी भागामध्ये आकाश अंशत: ढगाळ राहून हवेतील आर्द्रता वाढणार आहे. सध्या छत्तीसगढपासून सुरू झालेल्या प्रणालीमुळं विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटक, केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, त्यामुळं तापमानातही वाढ नोंदवली जात आहे.
राज्यातील किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय चढ- उतार होणार असून, अंशत: ढगाळ वातावरणही पाहायला मिळणार आहे. इतकंच नव्हे, तर राज्याच्या कैक भागांमध्ये उष्मा अधिक तीव्रतेनं जाणवण्यास सुरुवात होणार असून वाढत्या उष्णतेनं बाष्पीभवनाच्या प्रक्रियेला वेग येऊन विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र क्षेत्रात पावसाचा शिडकावा नाकारता येत नाही.
इथं महाराष्ट्रात सातत्यानं तापमानवाढीचे संकेत मिळत असतानाच तिथं स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये नव्यानं एक पश्चिमी झंझावात धडकणार असल्याचा इशारा दिला आहे. या झंझावाताचा परिणाम जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेशातील अतीव उंचीच्या ठिकाणांवर दिसेल. तर, मैदानी भागांमध्ये मात्र याचा फारसा प्रभाव दिसणार नाही. चालू आठवड्याच्या मध्यापर्यंत वाऱ्यांची ही दिशा बदलले. एप्रिल महिन्यात देसभरात उष्मा वाढण्याचे संकेत असून, उष्णतेची लाट तीव्र होत जाऊन महिनाअखेरीत ती मंदावणार आहे.