Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ऊन- पावसाचा लपंडाव सुरु असतानाच राज्यात एकाएकी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, कुठे सर्वाधिक मारा?

Maharashtra Weather News : मान्सून रेंगाळला असला तरीही राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असल्यानं तापमानात चढ- उतार पाहायला मिळत आहेत.

ऊन- पावसाचा लपंडाव सुरु असतानाच राज्यात एकाएकी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, कुठे सर्वाधिक मारा?

Maharashtra Weather News : देशाच्या दक्षिण किनारपट्टीपासून ते अगदी उत्तरेपर्यंत कमीजास्त स्वरुपात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात वाऱ्याची दिशा आणि वेगाचा परिणाम महाराष्ट्रातील मान्सूनवर होत असून, काही अंशी हा मोसमी पाऊस लपंडाव खेळताना दिसत आहे. ज्यामुळं तापमानाच मोठा चढ उतार होऊन मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे, रायगडमध्ये उष्मा वाढला आहे. 

काही दिवसांमध्ये हवामानाचं हे चित्रसुद्धा बदलणार

पुढच्या काही तासांमध्ये अन् काही दिवसांमध्ये हवामानाचं हे चित्रसुद्धा बदलणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात पुढीचे तीन दिवस कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मोठ्या विश्रांतीवर असणाऱ्या मोसमी वाऱ्यांनी बुधवारीसुद्धा प्रगती केलेली नाही, ज्यामुळं हे वारे अद्यापही मुंबई, अहिल्या नगर, आदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट याच क्षेत्रावर रेंगाळले आहेत. अद्यापही मान्सूनच्या वाऱ्यांचा पुढील टप्पा अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरादरम्यानच रेंगाळला असून, आता ही प्रणाली नेमकी केव्हा पुढे सरकणार याचीच प्रतीक्षा हवामान विभागही करत आहे. 

ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार

दरम्यानच्या काळात गुरुवारी मुंबईसह ठाणे, पालघर भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गुरुवारी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पडणार असून, यादरम्यान ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारेसुद्धा वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघर्जनेसह पावसाची हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून, या धर्तीवर यलो अलर्टसुद्धा जारी करण्यात आला आहे. त्यामुळं राज्यात तूर्तास काही दिवस ऊन पावसाचा खेळ सुरूच राहणार असून, मधूनच ढगांचा गडगडाट धडकी भरवणार असं म्हणायला हरकत नाही. 

Read More