Guardian Minister of Raigad : रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरून महायुतीत वाद पेटला आहे. सुनील तटकरे यांनी पाठीत खंजीर खुपसला अशा शब्दांत शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी निशाणा साधला आहे. तसंच हिंमत असेल तर राजीनामा द्या असं आव्हान महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांना दिलं आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. अशातच रायगडच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतला वाद आता पार टोकाला पोहचला आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत थेट सुनील तटकरे यांनाच इशारा दिला आहे. सुनील तटकरे यांनी नेहमी स्वतःच्या घरात पदे घेतली हे शिवसेना खपवून घेणार नाही. भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री व्हायला पाहिजेत यासाठी सुनील तटकरे यांनी माघार घ्यावी असं ते यावेळी म्हणाले. तसंच जोपर्यंत पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नाही तो पर्यंत राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही अशी भूमिका महेंद्र दळवी यांनी व्यक्त केली. इतकंच नाही तर आयुष्यात राष्ट्रवादी पुढे मी कधीच नमस्तक होणार नाही असं म्हणत त्यांनी सुनील तटकरे यांना आव्हान दिलं आहे.
लवकरच पालकमंत्रीपदावर तोडगा निघेल
दरम्यान, महेंद्र थोरवे यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांनी थोरवेंवर पलटवार केला आहे. सुनील तटकरे यांचं नाव घेतल्याशिवाय महेंद्र थोरवे यांचे राजकारण चालत नाही, आमदार थोरवे रायगडचा वाल्मीक कराड, असल्याची घणाघाती टीका घारे यांनी केली आहे. या वादावर योगेश कदम यांनी लवकरच पालकमंत्रीपदावर तोडगा निघेल असं म्हटलं आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही सुटत नाहिये. भरत गोगावले, सुनिल तटकरे या दोघांमध्ये आणि त्यांचे कार्यकर्तेही आता उघड उघड टीका करत आहेत. नॅपकिनच्या वादानंतर दोन्हीकडचे नेते कडक शब्दात टीका करत आहेत. आता जिल्ह्याला पालकमंत्री कधी मिळणार, आणि दोन्ही पक्षही नरमाईची भूमिका घेतायेत का याकडे लक्ष आहे.