Manikrao Kokate: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना अजित पवारांनी अभय दिल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे कोकाटेंच्या ऑनलाईन रमीबाबत रोहित पवारांनी एक मोठा दावा केलाय. तसंच रोहित पवारांनी ट्विट करत राज्य सरकारला एक सवालदेखील केलाय. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे माणिकराव कोकाटेंवर कारवाई करणार का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.
केवळ ऑनलाईन रमीची जाहिरात स्किप केल्याचा दावा करणारे माणिकराव कोकाटे चक्क 22 मिनिट पत्ते खेळत असल्याचा अहवाल समोर आल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. विधिमंडळाकडून करण्यात आलेला चौकशीचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सादर करण्यात आल्याचा दावा देखील ट्विट करत रोहित पवारांनी केलाय. त्यामुळे या अहवालानंतर कोकाटेंवर कारवाई करण्यात येणार का? असा सवाल देखील रोहित पवारांनी विचारलाय.
कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. सभागृहात तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असा प्रश्नही विचारला जातोय.
सभागृहात माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात येतेय. त्यांच्यावर कारवाई होईल अशी शक्यता असतानाच कोकाटेंना पुन्हा अभय देण्यात आल्याची चर्चा सुरू झालीय. याबाबत
कोकाटेंना विचारलं असता त्यांनी याबाबत बोलणं टाळलंय.
माणिकराव कोकोटेंच्या राजीनाम्यावरून संजय राऊतांनी सवाल उपस्थित करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला. सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा देत असल्याचा आरोप देखील त्यांना केलाय. तसंच भ्रष्टाचारी मंत्र्यांचे पुरावे घेऊन राष्ट्रपतींकडे जाणार असल्याचा इशारा देखील राऊतांनी यावेळी दिलाय. तर कोकाटे पारावर बसल्यासारखं बोलतात त्यामुळे ते अडचणीत सापडत असतात असं म्हणत सदाभाऊ खोतांनी देखील कोकाटेंना टोला लगावलाय.
तर तिकडे माणिकराव कोकाटेंवर कारवाई न झाल्यामुळे छावा संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार घाडगेंनी आंदोलनाचा इशारा दिलाय. अजित पवारांनी दिलेल्या शब्द पाळला नसल्याचा आरोप देखील घाडगेंनी यावेळी केलाय.
माणिकराव कोकाटेंवर कारवाई करावी यासाठी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. तसंच माणिकराव कोकाटेंच्या विधानांमुळे सरकारची देखील कोंडी होत होती. त्यामुळे ऑनलाईन रमीचं प्रकरण समोर आल्यानंतर कोकाटेंवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची दाट शक्यता होती. मात्र, दादांच्या मंत्र्यांनी शिंदेंच्या मंत्र्यांवर आधी कारवाई करण्याची मागणी केल्याची माहिती आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटेंना अभय मिळाल्याची चर्चा राजकीय
वर्तुळात सुरूय.