Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रात मान्सून 12 दिवस आधीच का दाखल झाला? हवामान विभागाने सांगितलं खरं कारण; काय आहे एमजेओ इफेक्ट?

Maharashtra Rain: मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यावेळी मान्सून वेळेआधीच दाखल झाला असल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. दरम्यान मान्सून वेळेआधी दाखल होण्यामागे एमजेओ प्रभाव कारणीभूत ठरल्याचं समजत आहे.   

महाराष्ट्रात मान्सून 12 दिवस आधीच का दाखल झाला? हवामान विभागाने सांगितलं खरं कारण; काय आहे एमजेओ इफेक्ट?

चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे

Maharashtra Rain: मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यावेळी मान्सून वेळेआधीच दाखल झाला असल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. मुंबईत तर जनजीवन विस्कळीत झालं असून, अचानक आलेल्या मुसळधार पावसाने तयारी करण्याचीही संधी दिली नाही. मान्सून वेळेआधी दाखल झाल्याने अनेकांना यामागे नेमकं काय कारण आहे असा प्रश्न पडला आहे. यामागे एमजेओ प्रभाव कारणीभूत आहे. हवामानाच्या एमजेओ प्रभावामुळेच यंदा राज्यात तब्बल 12 दिवस आधी मान्सूनचं आगमन झाल्याचे निरिक्षण पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ डॉ. एस डी सानप यांनी नोंदवलं आहे. 

हवामान शास्ञातील ही संकल्पना मँडन & ज्युलिएन शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली असल्याने त्यांच्याच नावाने हा इफेक्ट ओळखला जातो. एमजेओ म्हणजे हा एक ढगांचा पट्टा असून तो पूर्वेकडून पश्चिमकडे मार्गक्रमण करत असताना मौसमी वाऱ्यांच्या संपर्कात आल्यास वेळेआधीच मान्सून बरसतो. यंदाही काहीसं तसंच झाल्याचं निरिक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. 

राज्यात यंदा तब्बल 35 वर्षांनंतर तब्बल 12 दिवस आधीच मान्सूनचं आगमन झालं आहे. यापूर्वी 1990 साली राज्यात तब्बल 20 मे रोजीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता. महाराष्ट्रातील मान्सून एन्ट्रीची तारीख ही सरासरी 5 जून असते, यंदा माञ, तो 25 मे रोजीच राज्यात दाखल झाला आहे. 

पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ डॉ. एस डी सानप यांनी सांगितलं आहे की, "मान्सून लवकर येण्याची वेगवेगळी कारणं असतात. एमजेओ नावाचा एक पॅटर्न आहे. तो जर सक्रीय असेल तर चांगला पाऊस होतो. यावर्षी तो सक्रीय नव्हता, पण भारतीय समुद्रातून त्याचा प्रवास असल्याने हे कारण असू शकतं. एमजेओ म्हणजे हा एक ढगांचा पट्टा असून तो पूर्वेकडून पश्चिमकडे समुद्रातून मार्गक्रमण करत असताना मौसमी वाऱ्यांच्या संपर्कात आल्यास वेळेआधीच मान्सून बरसतो. त्याचा प्रभाव कमी जास्त असतो". 

दरम्यान राज्यात 29 ते 31 मे दरम्यान पुन्हा जोरदार पाऊस येण्याची वाट शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी लगेच आज उद्या पेरणीची घाई करू नये, राज्यात साधारण 3 जून नंतर मान्सूनचा पहिला टप्पा किंवा स्पेल संपेल त्यांनंतरच म्हणजे साधारण जून च्या पहिल्या आठवडच्या शेवटी शेतकरी वर्गाने पेरणीला सुरूवात करावी, असा सल्ला ज्येष्ठ कृषी हवामान तज्न डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. 

Read More