Mumbai News : (Maharashtra assemblt monsoon session) विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार संजय गायकवाड यांच्याकडून पुन्हा एकदा आमदार निवासाची दूरवस्था आणि तेथील जेवणाचा निकृष्ट दर्जा या मुद्द्यावरून काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधलं जाणार असून, आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगासंदर्भात त्यांनी झी 24तासशी संवाद साधताना माहिती दिली.
'माझी 10 ची जेवणाची वेळ असते. मी साडेनऊला वरण भात चपातीची ऑर्डर दिली. पहिला घास घेतला तेव्हा मला मळमळ झाली. जेवणाचा वास घेतला तेव्हा ते अगदी कुजलेलं होतं, ज्याचा वासही घेता येत नव्हता. यापूर्वीसुद्धा कॅन्टीनला अनेकदा समज दिली होती किमान आमदारांनातरी चांगलं जेवण देत चला. तिथं दिली जाणारी अंडी 10 दिवसांची असतात, नॉन व्हेज 15 दिवसांचं असतं.
मी शेतकरी आहे , मला अन्नाची पारख आहे. मी जेवणावरून ओळखू शकतो ते किती तासांपासून शिजलंय. मी खाली गेलो, जेवणाचा वास त्यांच्याच कर्मचाऱ्यांना दिला तिथं जेवणाऱ्यांना दिला. कर्मचाऱ्यांनीही मान्य केलं की हे सडलेलं आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं शेतकरी, गोरगरिब येतात, आज आमच्यासोबत असं वागतात, त्या लोकांसोबतही हे असेच वागत असतील.
शेवटी मराठीत त्यांना कळत नाही, इंग्लिशमध्ये कळत नाही शेवटी मग आहे त्या अवस्थेत मी जेवणाच्या ताटावरून उठलो आणि त्याला जाब विचारला', असं गायकवाड म्हणाले. मारहाणीविषयी विचारलं असता, 'राग आला तर मारहाण होणार नाही का? आमची सणकली ना फटकन मग, सटकन दिली ठेवून शिवसेना स्टाईलमध्ये...', असं ते म्हणाले.
आमदारनिवासातील खोल्यांचं छत, रुमची दूरवस्था.... असे प्रश्न त्यांनी यापूर्वी उपस्थित केले होते. त्यातच आता अन्नाचा मुद्दा उपस्थित झाल्याचं पाहता शासनाकडे काय मागणी राहील? या प्रश्नाचं उत्तर देताना, मुंबईत आमदारांना जसं ठेवतात, तशा जागांमध्ये गावाकडे जनावरं ठेवतात. आता 10 बाय 10 च्या खोलीमध्ये आमदाराचे पीए, त्यांचे कार्यकर्ते कसे काय राहणार? त्याच जेवणाचा हा असा प्रकार. म्हणजे हा आमदारांच्या जीवाशी खेळायचाच प्रकार आहे असं म्हणत त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
'कॅन्टीन मालकानं स्पष्ट सांगितलं ये गंदा है...' याचाच पुनरुच्चार करत ते जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याचं सांगत कॅन्टीनचा परवाना बदलत नाही, तक्रारी येऊनही सारंकाही जैसे थे आहे याबाबत त्यांनी निराशेचा सूर आळवला. 'मला वाटतं या कॅन्टीनचा मालक बदललेला नाहीय. रात्रीसुद्धा काहींनी मला जेवणातील तक्रारी दिल्या, मुळात कॅन्टीन मालकाची ग्रामीण भागातील लोकांशी बोलण्याची पद्धत चांगली नसून ते अतिशय मुजोरी करतात, त्यामुळं हे आमच्याशीन नव्हे लाखो सामान्यांच्या जीवाशी खेळतात', असं म्हणत, इथं वारंवार एकाच माणसाला टेंडर मिळतं म्हणजे 'हे मॅनेजच होतंय, प्रचंड पैसा मिळतोय म्हणूनच हे होतंय' असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.
आपण झाल्या प्रकरणी अध्यक्ष महोदयांना सभागृहात पॉईंट ऑफ इंन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हे वास्तव मांडणार असल्याचं सांगत, 'कॅन्टीमधील मारहाणीसारख्या घटनेमुळं कायदा, सुव्यवस्था बिघडत नसते. हा वैयक्तिक विषय असून इथं जातीवादाचा मुद्दा नाही. सगळ्या भाषा सांगून ऐकत नसतील तर मला बाळासाहेबांनी शेवटची भाषा शिकवली आहे, ती हीच आहे', असं गायकवाड स्पष्टच म्हणाले.