Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं', संतापलेल्या राज ठाकरेंचं थेट आव्हान

Raj Thackeray on Bhaiyaji Joshi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्यानंतर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) संताप व्यक्त केला आहे.   

'भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं', संतापलेल्या राज ठाकरेंचं थेट आव्हान

Raj Thackeray on Bhaiyaji Joshi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही असं विधान केल्यानंतर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) संताप व्यक्त केला आहे. भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं असं जाहीर आव्हानचं त्यांनी दिलं आहे. तसंच तुम्ही नवा संघर्ष उदयाला आणत आहात असा इशारा दिला आहे. 

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं. देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भैय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का?," अशी विचारणा राज ठाकरेंनी केली आहे. 

"उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का?," असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. 

 
"सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत . हे काय चाललय हे न समजण्याइतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडावं?," असं आश्चर्य राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. 
 
"आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले . त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ? या असल्या काड्या घालून  ( अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही ) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलूच," असं त्यांनी सांगितलं आहे.  

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

Read More