Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शिंदेंनी शाहांना दिली ठाकरेंची युती रोखण्याची गॅरंटी? मोठा राजकीय दावा; 'ठाकरे आपल्या दबावाखाली...'

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीत काय घडलं यासंदर्भात मोठा दावा करण्यात आला आहे.

शिंदेंनी शाहांना दिली ठाकरेंची युती रोखण्याची गॅरंटी? मोठा राजकीय दावा; 'ठाकरे आपल्या दबावाखाली...'

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: "महाराष्ट्रात सध्या मराठी एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत. उद्धव आणि राज ठाकरे 5 जुलै रोजी मराठी विजय सोहळ्यांत एकत्र आले. त्यानंतर लोकांनी ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. मराठीवरील अन्याय सहन करणार नाही व त्यासाठी एकजुटीने लढण्याचा आत्मविश्वास मराठी लोकांत निर्माण झाला. दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे हा आत्मविश्वास निर्माण झाला हे खरे, पण त्यामुळे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे सर्व प्रश्न लगेच मार्गी लागले असे होत नाही. मराठी माणूस व त्याचे सर्व प्रश्न जेथच्या तेथेच आहेत," असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. "हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाही. ती युती होणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल," असं सूचक विधान राऊत यांनी केलं आहे.

जास्त भीती एकनाथ शिंदे व त्यांच्या बरोबरच्या लोकांना

"महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठी एकजुटीचे वादळ निर्माण झाले ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरले आहेत. ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतील. मराठी एकजुटीच्या विजय मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला विजेचे जोरदार धक्के बसले आहेत. त्याचे रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल व आपले राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची सगळ्यांत जास्त भीती एकनाथ शिंदे व त्यांच्या बरोबरच्या लोकांना वाटते. ते बरोबर आहे," असं राऊतांनी रोखठोक या 'सामना'च्या सदरातून म्हटलं आहे.

ही विधाने कशाच्या बळावर करतात?

"एकनाथ शिंदे हे चिंताग्रस्त होऊन लगेच दिल्लीत गेले. त्यांचे गुरू अमित शहांना भेटले. “महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे ते थांबवा. फडणवीस यांना हे वादळ रोखता येणार नाही.” यावर अमित शहा यांनी विचारले, “काय करायचे?” त्यावर शिंदे म्हणाले, “मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो. मला मुख्यमंत्री करा. हे सर्व रोखण्याची गारंटी देतो.” शहा -शिंदे यांच्यात ही चर्चा झाली व अशी चर्चा झाल्याची चर्चा शिंदे गटात सुरू आहे. शिंदे गटाचे उदय सामंत, शिरसाट अशा प्रकारचे मंत्री विधानसभेत उघडपणे बोलत होते की, “शहा व शिंदे मिळून मराठी माणसांची एकजूट फोडतील. राज व उद्धव यांना एकत्र येऊ देणार नाहीत.” शिंदे यांचे मंत्री ही विधाने कशाच्या बळावर करतात?" असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

नक्की वाचा >> 'एक दिवस स्वतः राज ठाकरेच समोर येऊन...'; फडणवीस, शिंदेंचा उल्लेख करत राऊतांचं विधान

संतापाचा लाव्हा आता महाराष्ट्राच्या

"ठाकरे आपल्या दबावाखाली येतील या कल्पनेत कोणी असतील तर ते मूर्ख आहेत. कोणताही दबाव आता मराठी माणूस स्वीकारणार नाही. वरळीनंतर मीरा-भाईंदर येथे ज्या पद्धतीने मराठी एकजूट उसळली ही खदखद सर्वच पातळीवर आहे. मुस्लिम समाजाबद्दल एकेकाळी नव्हता त्यापेक्षा जास्त रोष मुंबई - महाराष्ट्रात गुजराती, जैन समाजाबद्दल उफाळून येत आहे. तो अमित शहांच्या महाराष्ट्रद्वेष्ट्या राजकारणामुळे. हा संतापाचा लाव्हा आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात , शहरात बाहेर पडेल असेच चित्र आहे," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Read More