ओम देशमुख (प्रतिनिधी) मुंबई : भाजपने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणनिती आखायला सुरूवात केलीय. त्याच अनुशंगाने भाजप मुंबईतील आपला कॅप्टन बदलण्याच्या तयारीत आहेत. मुंबई भाजप अध्यक्षपदावर भाजप एका नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या तयारीत आहे. भाजपच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली. काय रणनिती आखण्यात आलीय हे पाहुयात.
विधानसभा निवडणुकीतल्या निर्विवाद विजयानंतर भाजपने आता मिशन मुंबई महापालिका हाती घेतल्याचं पाहायला मिळतंय. बीएमसी निवडणुकीसाठी भाजपने आता रणनिधी आखायला सुरूवात केलीये. दरम्यान बीएमसी निवडणुकीच्या आयपीएलच्या पार्श्वभूमीवर भाजप आथा मुंबईतल्या आपला कॅप्टन बदलणार आहे. सध्या आशिष शेलार हे भाजपचे मुंबई अध्यक्ष आहे. त्यांच्या जागी एका नव्या चेहऱ्याला भाजप संधी देणार आहे. मुंबईमध्ये भाजपच्या झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत यावर चर्चा झालीय.
हेही वाचा : ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे बंद? चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर चर्चांना उधाण
भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपची ही बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे मुंबईतील सर्व आमदार आणि सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. मुंबई अध्यक्ष पदासाठी भाजपमध्ये दोन नावं चर्चेत आहेत. त्यामध्ये पहिलं नाव आमदार प्रवीण दरेकर यांचं आहे.
आमदार प्रवीण दरेकर हे बीएमसी निवडणुकीसाठी आवश्यक असलेला मराठमोळा चेहरा आहे. तसेच ते विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते असलेले दरेकर सहकार व गृहनिर्माण क्षेत्रातील महत्त्वाचे नाव आहेत. यासह ते
मुंबई बँकेचे अध्यक्ष सुद्धा आहेत.
मुंबई अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये चर्चेत असलेलं दुसरं नाव आमदार अमित साटम यांचं आहे. आमदार अमित साटम हे अंधेरी पश्चिमचे 3 टर्मपासून आमदार असून ते मुंबई महापालिकेत 2 टर्म नगरसेवक राहिले आहेत. मुंबईतील स्थानिक प्रश्नांवर अमित साटम यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेते. ते मुंबई भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष असून ठाकरे गटाला प्रत्युत्तर देणारा मराठमोळा चेहरा सुद्धा असून संघ परिवाराशी चांगले संबंध आहेत.
मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत केवळ दोन जागांचा फरक होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप बीएमसीवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठीच मैदानात उतरणार आहे. त्यामुळेच आता भाजप मुंबईतला कॅप्टन बदलायच्या तयारीत आहे.