Mumbai Tragedy At Juhu Beach: मुंबईतील जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटादरन्यान हा तरुण मित्रांसह जुहू बिचावर भटकंतीसाठी गेला होता. मित्राबरोबर तो फोटो काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने तो बुडू लागला त्याने आणि सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. ही गोष्ट त्या ठिकाणी असलेल्या जीवरक्षक लक्षात आले. त्यांनी त्या युवकाचा जीव वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली आणि पोहत त्याच्याकडे आणि त्याला बाहेर काढले पण त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
जुहू कोळीवाडा येथील जेट्टीवर ही दुर्दैवी घटना घडली. वारंवार इशारा देऊनही हा 19 वर्षीय तरुण सेल्फी काढण्याच्या नादात समुद्रात बुडाला. मयत तरुणाचं नाव अनिल अर्जुन राजपूत असं आहे. शक्तिशाली लाटा आणि उथळ भरती-ओहोटीमुळे अनिल समुद्रात वाहून गेला.
शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून खवळलेला समुद्र पाहण्यासाठी आलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. "पाणी 'खूपच खवळलेले' होते आणि जेट्टीजवळील खडकांवर 'जोरजोरात आदळत' होते. संबंधित निरीक्षकाने वारंवार दिलेल्या आवाजाच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून चार तरुणांसह अनेक लोक जेट्टीच्या काठावर जाताना दिसले. मी त्यांना जेट्टीच्या निसरड्या बाजूजवळ जाऊ नका असे अनेक वेळा ओरडले, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं," असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास, एका तरुण दगडाभोवती लाटा आदळत असताना दोन्ही हात वर करून एका दगडावर धोकादायक पोज देताना दिसला. काही क्षणातच, एक जोरदार लाट आली आणि तो पाण्यात फेकला गेला. हा परिसर त्याच्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहासाठी आणि मोठ्या खडकांसाठी कुप्रसिद्ध असून लाटांचा विचार केल्यास या ठिकाणी बचाव कार्य अत्यंत कठीण होऊन बसतं आणि हेच या ठिकाणी झाल्याचं प्रत्यक्षदर्शी म्हणाला.
प्रत्यक्षदर्शीने स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपवर आपत्कालीन सेवा (100 क्रमांकावर) दोनदा कॉल केला आणि नंतर संकटसमयी पाठवतात तो संदेश पाठवला. अग्निशमन दलाचे सदस्य जुहू कोळीवाडा येथील विशाल गावडे यांनी हा संदेश पाहिला आणि जुहू बीचवर तैनात असलेल्या जीवरक्षकांना तातडीने सूचना दिल्या. पगली लेन प्रवेशद्वारावरून दोन जीवरक्षक पाठवण्यात आले आणि संध्याकाळी 5.49 वाजता हे जीवरक्षक घटनास्थळी पोहोचले.
जीवरक्षक येण्यापूर्वी पोहता येणाऱ्या एका धाडसी स्थानिक व्यक्तीने अनिलला वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्यात उडी मारली. मात्र आधीच घाबरलेल्या आणि पाणी नाका-तोंडात गेलेल्या अनिलने बचाव करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला घट्ट चिकटून राहिल्याने दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर पडता आलं नाही.
जोरदार प्रवाहामुळे आणि फ्लोटेशन उपकरणाच्या अभावामुळे बचावकर्त्याला काहीही करता आलं नाही. तो अनिलला "हाथ पेअर मारो, हाथ पेअर मारो" (हात आणि पाय हलवा) असे ओरडताना ऐकू आला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आणि अनिलचा मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर स्थानिक कोळी बांधव जुहू पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले. या पावसाळ्यातील ही पहिलीच दुर्घटना आहे. पोलिसांनी समुद्रात खोलवर जाऊ नये असे आवाहन यापूर्वीच केले आहे