Mumbai University: वर्षाला लाखो विद्यार्थ्यांना आयुष्यात करिअरचा मार्ग दाखवणाऱ्या मुंबई विद्यापीठासंदर्भात एक आश्चर्यजनक बाब समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिली पण यात मोठा शब्द घोळ गेल्याचे समोर आले आहे. मुंबई विद्यापीठाने आपलेच नाव चुकीचे छापल्याचा प्रकार समोर आलाय. विद्यार्थ्यांनी ही चूक विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
विद्यार्थी आपल्या उत्तरपत्रिकेत चुकीचे नाव लिहितात, स्पेलिंग मिस्टेक करतात, हे आतापर्यंत आपण ऐकलं असेल. पण नामांकित मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर मुंबई शब्द चुकीचा लिहिला आहे. मुंबई विद्यापीठाने प्रमाणपत्रावर इंग्रजीत 'मुंबई' ऐवजी 'मुमाबाई' लिहिले आहे. मुंबई विद्यापीठाने दीक्षांत समारंभात सर्व विद्यार्थ्यांना 'मुमाबाई' लिहिलेली पदवी प्रमाणपत्र वाटली. ज्यामुळे एकच गोंधळ उडाला.
7 जानेवारी रोजी मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला. ज्यात पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. 2023-24 बॅचच्या पदवीधर विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रमाणपत्रावर 'मुमाबाई विद्यापीठ' असे लिहिलेले असल्याचे निदर्शनास आले. दीक्षांत समारंभात मुंबई विद्यापीठाने 'मुंबई' असे चुकीचे स्पेलिंग असलेल्या पदव्या प्रदान केल्या. या पदवी प्रमाणपत्राबाबत अनेक महाविद्यालयांमधून प्रकरणे समोर आली आहेत. अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाला परत पाठवले.
मुंबई विद्यापीठाकडून ही चूक कशी झाली? याला कोण जबाबदार आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. यासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार मुंबई विद्यापीठाने हैदराबाद येथील एका कंपनीला प्रमाणपत्रे छापण्याचे काम दिले होते. छपाईच्या समस्येमुळे काही प्रमाणपत्रांमध्ये चुका झाल्या, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना दिली. किती प्रमाणपत्रांमध्ये त्रुटी होत्या याची आकडेवारी त्यांनी दिली नाही. दरम्यान 'आम्ही त्यात सुधारणा करत असल्याचेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता नवीन प्रमाणपत्रे मिळतील. सध्या विद्यापीठ प्रमाणपत्र सुधारण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई विद्यापीठाने स्वतःचे नाव चुकीचे लिहिणे ही लज्जास्पद बाब असल्याचे त्यांनी म्हटलंय. चुकीच्या स्पेलिंगमुळे प्रमाणपत्रे बनावट दिसत असल्याची प्रतिक्रिया एकाने दिलीय. जर विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी किंवा पुढील शिक्षणासाठी या प्रमाणपत्रांचा वापर केला तर काय होईल? असा प्रश्न एकाने विचारला. विद्यापीठाकडून अशी चूक अपेक्षित नव्हती. एवढी मोठी चूक असूनही दीक्षांत समारंभ झाला आणि पदव्या देखील प्रदान करण्यात आल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे.