Mumbai Weather March Forecast: मुंबईकरांना फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळांचे चटके बसू लागले आहेत. फेब्रुवारीमध्ये गुलाबी थंडी न पडता सूर्यदेवता कोपल्याचं पाहायला मिळालं. मात्र फेब्रुवारीमधील ऊन परवडलं अशी अवस्था मार्च महिन्यात होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईकरांनी तप्त उन्हाळ्यासाठी तयार राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात म्हणजेच मार्च ते मे महिन्यादरम्यान, मुंबईतील कमाल आणि किमान तापमान हे सरासरीपेक्षा जास्त असणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईत उष्णतेच्या अनेक लाटा येतील व या उष्णतेच्या लाटांची संख्या तसेच तीव्रता अधिक असेल.
मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यापासूनच नागरिकांना उकाड्याचा आणि उन्हाच्या तड्याख्याचा सामना करावा लागत असल्याचं दिसून आलं. कमाल तापमानाने सरासरी ओलांडली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईला उष्णतेच्या लाटांचाही इशारा देण्यात आला होता. मागील काही दिवसांत उष्ण व दमट हवामानामुळे मुंबईकर हवालदिल झाल्याचं दिसून आलं. आता पुन्हा मार्च महिन्यात नागरिकांना जोरदार उष्णतेचा सामना करावा लागणार असून यामुळे मुंबईकर बेजार होणार आहेत. मार्च ते मे या कालावधीमध्ये उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता जास्त असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा उन्हाळा जास्त तापदायक ठरण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या कमाल तापमानात घट झाली असली तरी यामध्ये अधूनमधून काही अंशांची वाढ होईल, असं सांगितलं जात आहे. मुंबईमध्ये उष्ण व दमट हवामान असेल. यामुळे मुंबईकरांकडे उकाडा सहन करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसेल. याचबरोबर मार्च ते मे महिन्यात काही वेळेस ढगाळ वातावरणाची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस राहील. मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानाच्या पाऱ्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबईकरांना मार्च महिना उष्णतेचा ठरणार असल्यानेच आरोग्याची काळजी घेणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबईत साधारणपणे फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक कमाल तापमान 36 ते 38 अंशांपर्यंत असते. फेब्रुवारीच्या मध्यानंतर तापमान वाढ व्हायला सुरुवात होते. फेब्रुवारीचा दुसरा पंधरवडा आणि मार्चचे पहिले काही दिवस तापमानामध्ये चढ-उतार होत राहतात. एकाएकी तापमानाचा पारा वर चढतो, मात्र त्यानंतर तापमान चढेच राहील, असं ठामपणे सांगता येत नाही. कधी अचानक तापमान थोडे खालीही उतरते. मात्र हिवाळ्यासारखा दिलासा आता अनुभवता येणार नसल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे. मुंबईला समुद्रकिनारपट्टी लाभल्याने हा पारा सतत चढता नसतो.
समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानामध्ये घटही होते. प्रशांत महासागरात सध्या सक्रिय असलेली 'ला निना' स्थिती कमकुवत झाली आहे. ती येत्या काळात अधिक कमकुवत होताना दिसत आहे. एप्रिलअखेर 'ला निना' निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे र्नैऋत्य मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशांत महासागरात कोणतीही विशेष स्थिती नसेल, याचा पावसाळ्यावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे.
दुसरीकडे पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढल्यामुळे पारा 39 अंशांवर पोहोचला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेचा पारा 36 ते 28 अंशांपर्यंत पोहचला होता. मागील 8 दिवसांपासून उकाडाही वाढला आहे. परिणामी शहरातील किमान तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ झाली असून, 10 ते 11 अंशांवर असलेले किमान तापमान आज 14 अंशापर्यंत पोहोचले. दरम्यान, मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमाल तापमान 39 अंश इतके नोंदविले गेले