नागपुर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सुरगाव शिवार येथे 5 जणांचा बुजून मृत्यू झाला आहे. जुन्या खाणीतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून ही घटना घडली आहे. यामध्ये एक पुरुष दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
एहतेशाम अन्सारी 26 वर्ष, रोशनी चौधरी 32 वर्ष, अंजली चौधरी 25 वर्ष, मोहित चौधरी 10 वर्ष, लक्ष्मी चौधरी 8 वर्ष अशी मृतांची ओळख पटली आहे. ही दुर्घटना आहे की सामूहिक आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत. पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 5 जणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यानं ही दुर्घटना आहे की आत्महत्या असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
नेमका काय प्रकार घडला? हे 5 जण या ठिकाणी कसे आले? ही दुर्घटना आहे की हत्या? या सगळ्याचा पोलीस कसून तपास करत आहेत. या खड्याच्या शेजारी 5 जणांनी आपल्या चपला आणि पुरुषाच्या खिशातील सामानही दिसत आहे. त्यामुळे हा सगळा प्रकार नेमका काय आहे, हे कळायला मार्ग नाही.
काही दिवसांपूर्वी पूर्णा नदीपात्रामध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उमेश कासारे 10 वर्षीय आणि 8 वर्षीय ज्ञानेश्वर घोरपडे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
निमखेडा बुद्रुक येथे 5 मुले पूर्णा नदीपात्रात पोहोयला आले होते. येथे पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने 2 मुलांचा बुडून मृत्यू झाला. बाहेर काढल्यावर मुलांना जाफराबाद खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.