पुण्यातील वैष्णवी हगवणेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. या घटनेमागील अनेक गोष्टी समोर येत आहेत. वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ केला जात असल्याच सांगण्यात येत आहे. लग्नातही 56 तोळे सोनं 7 किलो चांदी तसेच फॉर्च्युनर देण्यात आली होती. यानंतरही 2 कोटी रुपयांची मागणी करण्यात येत होती. या जाचाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याच सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावर आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपलं परखड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नाना पाटेकर यांनी हुंडा प्रथेबद्दल परखड मत व्यक्त करत म्हटलं आहे की, हुंडाबळी ही वृत्ती आहे. अशा वृत्तीच्या लोकांना कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे. लग्नावर भरमसाठ खर्च करायचा की नाही हा ज्याची त्याची वैयक्तिक बाब आहे. मला सांगायचं झालं तर, मी असा खर्च करण्यापेक्षा तो निधी वृद्धाश्रम, अनाथाश्रम किंवा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करेन.
पण पुढे नाना पाटेकर म्हणाले की, या प्रकरणामुळे मुलीच्या लग्नात अमाप खर्च करणारे आणि सामाजिक प्रतिष्ठा जपणारे मुद्दे चर्चेत आले आहे. दौलतजादा करणारी आणि व्यसनाधीन माणसे समाजाचा भाग आहेत. अशी माणसं समाजात असतात, हे वास्तव नाकारता येणार नाही. नाना पाटेकर म्हणाले की, झाडावर रोग येतो म्हणून झाडे वाढवायची नाहीत का? फळे चाखायची नाहीत का विवाहसोहळा हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. त्यामुळे या प्रकरणावर आपण काय करु शकतो याचा विचार करावा.
शवविच्छेदन अहवालात समोर आलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारेच पोलिसांनी सासू, पती आणि नणंदेची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक तपशील कथन केला. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणी झाल्याच्या एकूण 30 खुणा पोस्टमॉर्टमदरम्यान आढळून आल्या. वैष्णवीच्या अंगावरील जखमांपैकी 15 जखमा या तिने आत्महत्या करण्यापूर्वीच्या 24 तासांच्या आतील असल्याचं पोस्टमॉर्टम अहवालात म्हटलं असल्याचं पोलिसांनी न्यायालयात बाजू मांडताना स्पष्ट केलं.