Narayan Rane on Shaktipeeth Expressway : जेव्हा पासून शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करण्यात आली तेव्हापासून महामार्गाला विरोधाचीच किनार आहे. त्यातच आता खासदार नारायण राणे यांनी विकास कामात व्यत्यय आणणाऱ्यांना फटके देऊ असा सज्जड इशाराच दिला आहे. नारायण राणेंच्या या इशाऱ्यामुळे विरोधी नेत्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
शक्तीपीठ महामार्गावरुन राज्यभरात संतापाची लाट असताना भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रकल्पग्रस्तांना धमकीच दिली आहे. विकासात आडवे याल तर फटके देऊ असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. यावरुन आता वादाची ठिणगी पडली आहे. खरंतर राज्यातल्या तब्बल 12 जिल्ह्यांतून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गला जवळपास सर्वच जिल्ह्यातून विरोध होतो आहे. 2023 मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तेव्हापासून महामार्गाची गरज नाही, सुपीक जमीन यामध्ये जाईल असं म्हणत शेतकऱ्यांसह अनेक नेत्यांनी महामार्गाला विरोध केला. यासाठी लोकांच्या समस्यांबाबत नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित केली आहे. मात्र लोकांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी नारायण राणे यांनी त्यांना धमकीच दिली आहे.
हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग कसा आहे. देवेंद्र फडणवीसांचा हा महत्वकांक्षी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो आणि कोणत्या तीर्थक्षेत्रांना जोडतो. पाहूयात सविस्तर
असा असेल शक्तीपीठ महामार्ग
-शक्तीपीठ महामार्ग हा सहा पदरी असणारा आहे.
-महामार्ग राज्यातल्या 12 जिल्ह्यांतून जाणार आहे.
-या महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असतील
-48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असा प्रस्ताव
-महामार्गाने कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तिपीठे जोडली जाणार
-पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, दोन ज्योतिर्लिंग, आणि इतर तीर्थक्षेत्र जोडली जाणार
'राणेंच्या धमक्यांना भीक घालणार नाही'
दरम्यान नारायण राणेंच्या या वक्तव्यावर आता टीका होती आहे. राणे मुंबई-गोवा महामार्ग सुरू करू शकले नाही आणि आता धमकी देतात अशा धमक्यांना आपण भीक घालत नसल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं आहे. तर राणेंच्या या वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 'फटके देणाऱ्यांना आम्ही चटके देऊ' म्हणत पलटवार केला आहे.
राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गांची चांगली कनेक्टीव्हीटी आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाची तशी गरज नाही असं अनेकांचं म्हणण आहे. सरकारला कोणताही प्रकल्प पुढे न्यायचा असेल तर लोकांमध्ये जाऊन, त्यांच्याशी बोलून सांमज्यस्याची भाषा हवी. पण नारायण राणेंनी थेट फटक्यांचीच भाषा केली आहे.अशामुळे शक्तिपीठ महामार्गाला विरोधाची धार आणखी तीव्र होईल यात शंका नाही.