Nashik Politics: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल आणि नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तक्रारदाराने आपली तक्रार मागे घेतल्याने गुन्हे मागे घेण्यात आले. त्यामुळे या दोघांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय.
ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकमधील नेते मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय. मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश रखडल्याची चर्चा होती. मात्र, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्यामुळे आता ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. या दोन्ही नेत्यांवर गुन्हे दाखल केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून त्यांची हकापलट्टी करण्यात आल्याचा दावा देखील या दोन्ही नेत्यांकडून करण्यात आलाय.
पक्षातून हकालपट्टी केल्यामुळे वाईट वाटल्याची भावना मामा राजवाडे यांनी व्यक्त करून दाखवली. त्यामुळे कार्यकर्त्यांची बोलून पुढचा राजकीय निर्णय घेणार असल्याचं विधान देखील त्यांनी यावेळी केलं. तर ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केल्यामुळे आमचा मार्ग मोकळा झाल्याचं सुनील बागूल यांनी म्टलंय.. भाजपमध्ये प्रवेश करण्याला प्राधान्य देणार असल्याचं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.
सुनील बागूल, मामा राजवाडे यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्यानंतर संजय राऊतांनी भाजप आणि पोलीस प्रशासनावर सडकून टीका केलीय.आमच्या नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारल्यामुळे त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्याचा दावा राऊतांनी केलाय.
नाशिकमध्ये ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसतायत. आधी सुधाकर बडगुजर त्यानंतर विलास शिंदे आणि आता सुनील बागूल आणि मामा राजवाडे देखील भाजपात जाणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालंय.. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. नाशिक शहरातील काही माजी नगरसेवकांसह ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाशकात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झालीय. याचा फायदा आगामी पालिकेत भाजपला मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.
महायुतीचं सरकार आल्यापासून ते आजपर्यंत रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटत नाहीय. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झाडल्यात. मात्र आता रायगडला पालकमंत्री नसल्यानं जिल्ह्याच्या विकास कामांवर परिणाम झाल्याचं खासदार सुनिल तटकरेंनी कबुल केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रिपदाची जोरदार वादाला सुरूवात झालीय.राज्यात मोठ्या बहुमतात महायुतीचं सरकार आलं. सरकार स्थापन होऊन अर्ध वर्ष उलटलं मात्र अद्यापही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यात महायुतीच्या पक्षश्रेष्ठींना यश आलेलं नाहीय.. जाहिर केलेल्या पालकमंत्र्यांच्या नावाला स्थगिती देण्यात आली आणि त्यानंतर काही हा तिढा सुटायचं नाव घेत नाहीय. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पालकमंत्रीपदासंदर्भात एक मोठं विधान केलंय.. जिल्ह्याला पालकमंत्री असणं आवश्यक आहे. पालकमंत्री नसल्यानं विकासावर परिणाम होत असल्याचं सुनिल तटकरे यांनी म्हटलंय. तर पालकमंत्रिपदासंदर्भात लवकर निर्णय व्हावा अशी अपेक्षाही तटकरे यांनी यावेळी व्यक्त केलीय.पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला उशीर झाल्यानं नाशिक आणि रायगडच्या विकासावर परिणाम झाल्याची कबुली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. तर लवकरात लवकर सरकार यावर निर्णय घेणार असल्याचं आश्वासन यावेळी बावनकुळे यांनी दिलंय.पालकमंत्रिपदावरून शिंदेंचे आमदार वारंवार नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळताहेत. काहीच दिवसांपूर्वी पालमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून महेंद्र थोरवेंनी देवेंद्र फडणवीसांची तुलना थेट उद्धव ठाकरेंसोबत केली होती. तीन आमदार असताना शिवसेनेला पालकमंत्रिपद मिळालं नाही. उद्धव ठाकरेंनी देखील रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला दिलं होतं. आणि फडणवीसांनीही तेच काम केलंय. असं म्हणत महेंद्र थोरवेंनी नाराजी व्यक्त केलीय.