Rohit Pawar on Ajit Pawar: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यातच त्यांनी आता शासन भिकारी असल्याचं विधान केल्याने पुन्हा वादात अडकले आहेत. दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी जर मी ऑनलाइन रमी खेळत असेन आणि दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्यातील कोणीही निवेदन करावं. त्या क्षणी न थांबता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांकडे मी माझा राजीनामा सादर करेन असं जाहीर केलं आहे. या सर्व घडामोडींदरम्यान रोहित पवार यांनी अजित पवारांनी कृषिमंत्रीपद घ्यावं अशी माहणी केली आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून, कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्याकडं असणं गरजेचं असल्याने अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याचीही जबाबदारी सांभाळावी असं मत मांडलं आहे. सध्या राज्याचं अर्थमंत्रीपद अजित पवारांकडे आहे. रोहित पवारांनी अजित पवारांकडे पद सोपवण्याची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
"सीबीआय, सीआयडी एवढंच काय इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी सभागृहात महत्वाची चर्चा सुरु असताना कृषीमंत्री पत्ते खेळत होते, हे सत्य बदलणार नाही. त्यामुळं बेलगाम कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संपूर्ण राज्याची भावना असली तरी अजितदादा आणि फडणवीस साहेबांची राजकीय अपरिहार्यता नेमकी काय आहे, हे कळत नाही. राजकीय अपरिहार्यता असावी पण जनतेच्या भावनांचा उद्रेक होणार नाही इतकीही नसावी," असा सल्ला त्यांनी दिला आहे.
"महत्त्वाचं म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्याकडं असणं गरजेचं असल्याने अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याचीही जबाबदारी सांभाळावी, हेच शेतकऱ्यांच्या हिताचं ठरेल," असंही मत त्यांनी मांडलं आहे.
दरम्यान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपण सभागृहात रमी खेळतानाचा आरोप फेटाळून लावला. आपण जाहिरात स्कीप करत असताना, फक्त 18 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करुन आरोप प्रत्यारोप केले जात असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. त्यानंतरचा व्हिडीओ जाणुनबुजून शेअर करण्यात आला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. यानंतर रोहित पवार यांनी एक नवा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ 22 सेकंदाचा आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा दावा फेटाळून लावला.
हा व्हिडीओ शेअर करताना रोहित पवारांनी लिहिलं आहे की, "सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो?".
#राजीनामा_द्यावाच_लागेल!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 22, 2025
सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत… pic.twitter.com/KQJE4eHtwz
"विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती," असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
"विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?," अशी विचारणाही त्यांनी केली आहे.