सीमा आढे, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही काळात अनेक मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. राज्यात आधी महाविकास आघाडी आणि नंतर महायुतीची सत्ता आली आणि कधी नव्हे ती राजकीय समीकरणं पाहायला मिळाली. अनेक राजकीय तज्ज्ञांचे अंदाजही फोल ठरले होते. दरम्यान राज्यात पुढील काही दिवसात स्थानिक पातळीवर नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळू शकतात. स्थानिक पातळीवर भाजप वगळता कुणाशीही राष्ट्रवादी युती करु शकते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने नवं धोरण स्विकारलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी शरद पक्षाने नवं धोरण स्विकारलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक पातळीवर भाजपा वगळता कुणाशीही युती करु शकते. महत्त्वाचं म्हणजे स्थानिक पातळीवर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंशी युतीचाही पर्याय खुला आहे. युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीच्या नेत्यांवर सोपवले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्र येण्यास फारसे इच्छूक नसल्याची सूत्रांची माहिती आहे. अद्याप महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही.
सुप्रिया सुळे यांना यासंदर्भात पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं असता म्हणाल्या की, "26 वर्षांपासून स्थानिक नेते ठरवतील हेच आमचं ठरलेलं आहे. तेव्हा जायचं की नाही हे नेते ठरतात. कार्यकर्ते हेच शरद पवारांची ताकद आहे. सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं. मी तुम्हाला अधिकार देतो, निर्णय घ्या सक्षम व्हा अशी त्यांची भूमिका असते ". दरम्यान यावेळी त्यांना अजित पवारांसोबतच्या युतीसंदर्भात विचारलं असता पाऊस आल्यावर छत्री घ्यायची की रेनकोट हे ठरवू असं उत्तर त्यांनी दिलं.