Mumbai Coast On High Alert: महाराष्ट्रातील मासेमारी विभागाने मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांसाठी विशेष सूचना जारी केली आहे. अरबी समुद्रामध्ये तेल उत्खनन चालतं अशा ठिकाणी तसेच संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या समुद्रातील भागांमध्ये म्हणजेच नौदलाच्या भागात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या 877.97 किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यासाठी हा नियम लागू असणार आहे, असंही जाहीर करण्यात आलं आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर तणावपूर्ण वातावरण असून पाकिस्तानकडून सातत्याने ड्रोन्स आणि शस्रसंधीचं उल्लंघन करुन कुरघोड्या करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांबरोबर एक विशेष बैठक घेतली. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांबरोबरच, मासेमारी विभाग, कोस्टल पोलीस, सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरीटी फोर्स आणि कोस्ट गार्डचे अधिकारीही या बैठकीला उफस्थिती होते. कोळी बांधवांनी मासेमारीसाठी संवेदनशील ठिकाणी जाऊ नये असं या
"किनारपट्टी भागामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रवेश बंदी असलेल्या भागात प्रवेश केल्यास 'दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे' म्हणजेच 'शूट टू किल'चे आदेश या उच्च स्तरीय बैठकीत देण्यात आले आहेत," अशी माहिती राज्य सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिल्याचं वृत्त 'फ्री प्रेस जर्नल'ने दिलं असून हा अधिकारी संरक्षणासंदर्भातील विभागात कार्यरत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये 10 सशस्र दहशतवादी मासेमारी करणाऱ्या बोटीमधून मुंबईत दाखल झाले होते. या दहशतवाद्यांनी एक मासेमारी करणारी बोट हायजॅक करुन प्रवेश केलेला. याच पार्श्वभूमीवर आता मासेमारी करणाऱ्या बोटींचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून बोटींची ओळख पटावी म्हणून त्यामध्ये जीपीएस लावलेलं असावं असं बंधनकारक करण्यात आलं आहे.
"राज्य सरकारबरोबर गुप्तचर यंत्रणांनी शेअर केलेल्या माहितीमध्ये पाकिस्तानी किनाऱ्यांवरील सुरक्षा दलांनी जप्त केलेल्या गुजरातमधील काही मासेमारी करणाऱ्या बोटींपासून धोका आहे. मुंबईजवळच्या परिसरामध्ये घुसखोरी करण्यासाठी या बोटींचा वापर केला जाऊ शकतो. या बोटींवरुन रॉकेट लॉन्चर्सच्या माध्यमातून हल्ले होऊ शकतात," असं सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
मासेमारीसाठी गेलेल्या कोळी बांधवांनी समुद्रातील हलचालींवर बारीक नजर ठेवावी आणि काहीही संशयास्पद आढळून आल्यास सुरक्षा यंत्रणांना तातडीने कळवावं, असं आवाहनही कोस्टल पोलिसांनी आणि भारतीय नौदलाने केलं आहे.