Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

..अन्यथा नक्षलवादी होऊ दाखवेन, शेतकऱ्याच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

निराश झालेल्या वैभवचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र 

..अन्यथा नक्षलवादी होऊ दाखवेन, शेतकऱ्याच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मयुर निकम, बुलढाणा  : बुलढाण्यातील फार्मसीच्या एका विद्यार्थ्याला बँकेनं शैक्षणिक कर्ज नाकारलं. त्याचं कारण होतं वडिलांचं थकलेलं पिककर्ज... त्यामुळे त्यानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. या पत्राची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे. नेमकं काय लिहिलंय या विद्यार्थ्यानं?

'एकतर शैक्षणिक कर्ज द्या...' 'नाहीतर आत्महत्येची परवानगी द्या...' 'अन्यथा नक्षलवादी होऊ दाखवेन !'

ही वाक्यं आहेत वैभव मानखैरे या तरुणाची... बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील काकोडा गावचा राहणारा... वैभवनं शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला होता. मात्र बँकेनं कर्ज नाकारल्यानं त्याचं शिक्षण थांबलंय. त्यामुळे निराश झालेल्या वैभवनं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.

'शैक्षणिक कर्ज देऊ शकत नसाल, तर आत्महत्येची परवानगी द्या. आत्महत्येलाही परवानगी देणं शक्य नसेल, तर मी एका वर्षात उत्कृष्ट नक्षलवादी बनून दाखवेन आणि अशा बोगस सिस्टिमचं कंबरडं माझ्या पद्धतीनं मोडण्याचा प्रयत्न करेन.' असं वैभवनं या पत्रात लिहिलंय...

वैभवचा मोठा भाऊ प्रसाद वडिलांसोबत शेती करतो. अभ्यासात हुशार असलेल्या वैभवनं बारावीनंतर धुळे जिल्ह्यातील बोराडीच्या फार्मसी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली. पहिल्या वर्षात चांगले गुणही मिळाले. मात्र साठवलेले पैसे शिक्षणावर खर्च झालेत. शिक्षण सुरू राहावं यासाठी त्यानं संग्रामपूरच्या बँक ऑफ महाराष्ट्रकडे कर्ज मागितलं. चार महिने बँकेच्या पायऱ्या झिजवल्या. आज-ना-उद्या कर्ज मिळेल, या आशेवर वैभव होता. मात्र वडिलांचं पिककर्ज थकल्याचं कारण देत बँकेनं वैभवला कर्ज नाकारलं.

कर्ज नामंजूर झालंय हे सांगायला बँकेनं 4 महिने का घेतले, हा प्रश्न आहे. वैभवचा वेळ वाया गेला. त्याला दुसऱ्या बँकेत प्रयत्न करता आले नाहीत. आता शिक्षण अर्धवट सोडावं लागण्याची भीती वैभवला सतावतेय... पत्रातील आत्महत्येची किंवा नक्षलवादाची भाषा ही त्याच्या उद्विग्नतेमुळे आहे. मात्र यामागच्या वैभवच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे. एका शेतकऱ्याच्या होतकरू मुलाचं शिक्षण पैशांआभावी अडणं पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही. 

Read More