सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : (Pandharpur News) आषाढी कार्तिकीच नव्हे, तर आता जवळपास वर्षभर पांडुरंगाची नगरी असणाऱ्या पंढरपुरात भाविकांची मोठी रिघ पाहायला मिळत आहे. अशा या अनेकांसाठी वैकुंठस्वरुप असणाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरपुरातून एक खळबळजनक बाब समोर आली आहे.
बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पंढरपूर इथं भाविकांच्या भक्तीचा सौदा केला जात आहे अर्थात भाविकांची मोठी फसवणूक केली जात आहे. जिथं चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून भाबड्या भाविकांना विकलं जात आहे. सुरक्षेसाठी उभ्या असलेल्या बीव्हिजी कंपनी सुरक्षा रक्षका कडून भाविकांना चंद्रभागेचं पाणी विकल्य़ाचा हा प्रकार नुकताच उघडकीस आला आणि पंढरपुरात नेमकं काय सुरुय हे लक्षात आलं.
चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली असल्यामुळं महाद्वार घाटावरून नदीत उतरण्यास भाविकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. या ठिकाणी बॅरिगेटिंग लावण्यात आलं असून तिथं बिव्हीजी कंपनीचे सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. हे सुरक्षारक्षक तिथं कंत्राटी तत्वावर कामावर रुजू आहेत. मात्र हेच सुरक्षारक्षक नदीतील पाणी भाविकांना तीर्थ म्हणून विकत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. बीव्हीजी कंपनीला मंदिर सुरक्षा रक्षकाचं कंत्राट मिळाल्यापासून ही कंपनी अनेक प्रसंगी वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पाहायला मिळालं आहे.
किंबहुना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि प्रशासनाने या पूर्वीच्या घटनांवर कठोर कारवाई केली नसल्याने अशा घटना वाढत असल्यानं अनेकांनीच नाराजीचा तीव्र सूरही आळवला आहे. ज्यामुळं आता या नव्या प्रकणावर काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.