Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी तरीही पवार बेळगावात पोहोचले होते, लढवलेली खास शक्कल!

सुप्रिया सुळेंना शरद पवारांच्या जुन्या आंदोलनाची आठवण...

महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी तरीही पवार बेळगावात पोहोचले होते, लढवलेली खास शक्कल!

Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाचा प्रश्न आता चांगलाच पेटला असून बेळगावमध्ये महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलं असून महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटताना दिसले. सीमावादाचा प्रश्न हा काही नवीन नसून अनेक वर्षांपासून चालत आला आहे. याच  पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार यांनी पवारांनी केलेल्या आंदोलनाबाबत एक खास पोस्ट शेअर केलीये. 

सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट-
कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरु झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला आदरणीय पवार साहेबांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली.

साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही. खुद्द एस. एम. जोशी देखील साहेबांच्या पाठीवर उमटलेले वळ पाहून हळहळले होते. तो काळच तसा होता. सीमाभागात राहणाऱ्या जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्णय समितीने घेतला.

खुद्द एस एम जोशी यांनी १९८६ मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जावून भर चौकात निषेध नोंदवतील, असं ठरवलं. अर्थातच याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली.

पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय पवार साहेबांकडे होते. बेळगावात दाखल होण्यासाठी साहेबांनी एक शक्कल लढविली. ते कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेत सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला. साहेबांनी स्वतः ड्रायव्हर असल्याची बतावणी केली. खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवलं. तिघे जण निघाले. चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली परंतु त्यांना काहीच कळलं नाही. साहेब बेळगावात पोहोचले पण कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता.

बेळगावात जमावबंदी होती. साहेब पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्काम केला. आंदोलनाची वेळ झाली. बरोबर 11 वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलीस गोंधळले. संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. साहेब, बाबासाहेब कुपेकर, आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली.

साहेबांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आलं. तेथेही लोक जमा झाले. वयस्कर एस एम जोशी साहेबांना भेटायला गेले. त्यांनी त्यावेळी साहेबांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एसएम हळहळले होते. हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारंच 360 अंशात बदललंय.

Read More