Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

हाताचा तुकडा पाडला तरी दुसऱ्याच दिवशी आरोपींना जामीन; पोलीस म्हणतात, 'नव्या कायद्याचा आधार...'

Pimpri Crime:   या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाला. अगदी दुसऱ्या दिवशीच जामीन मिळालाय.

हाताचा तुकडा पाडला तरी दुसऱ्याच दिवशी आरोपींना जामीन; पोलीस म्हणतात, 'नव्या कायद्याचा आधार...'

Pimpri Crime: धारदार शस्त्राने हल्ला करत त्याने डाव्या हाताचा पंजा शरीरापासून वेगळा केला. एवढंच नव्हे तर उजव्या हाताचा पंजाही अर्धा कापला. असं असताना आरोपीवर मोठी कारवाई झाली असेल असे तुम्हाला वाटत असले तर थोडं थांबा. कारण या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाला. अगदी दुसऱ्या दिवशीच जामीन मिळालाय. यामुळं पीडिताचे नातेवाईक संतापलेयत. कुठे घडला हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

वाद चिघळला 

डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या रोहनचा तिघांसोबत वाद झाला आणि यात धारदार शस्त्राने रोहनचा हात कापण्यात आला.  रोहन निमज, शुभम पवार आणि प्रशांत सकट अशी जामिनावर बाहेर पडलेल्या आरोपींची नावं आहेत. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या रोहनचे घराशेजारी राहणाऱ्या राहुल कणघरे सोबत पूर्वीचे वाद होते. त्यामुळं राहुल आणि रोहनमध्ये खटके उडायचे. यातून रोहन अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टीतून उचकवायचा. चार दिवसांपूर्वी ही दोघांमध्ये असाच वाद झाला होता. या रागातून रोहनने त्याचे मित्र शुभम आणि प्रशांतच्या मदतीने राहुलला संपवण्याचा कट रचला. 

पोलीस आयुक्तालायसमोर आंदोलन 

घरात बसलेल्या राहुलला विश्वासात घेऊन त्याने बाहेर बोलावलं. तिथून ते थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानशेजारी आले, तिथं दोन्ही मित्रांनी राहुलला पकडले अन रोहनने शस्त्राने डोक्याच्या दिशेने वार केला. राहुलने डोक्यावरचा वार चुकवण्यासाठी हात मध्ये घातला. यात डावा पंजा शरीरापासून वेगळा झाला तर उजवा पंजा अर्धा कापला गेला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी रोहनसह दोन्ही मित्रांना बेड्या ठोकल्या. पण प्रकरण इतकं गंभीर असताना दुसऱ्याचं दिवशी तिन्ही आरोपींना जामीन कसा काय मिळाला? हा प्रश्न उपस्थित करत नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायसमोर आंदोलन छेडलं. 

नव्या कायद्याच्या आधारावर न्यायालयाने आरोपींना जामीन

संतप्त नातेवाईकांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायसमोर केलेल्या आंदोलनानंतर वाकड पोलिसांना जाग आली यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात पुन्हा धाव घेण्याच्या दृष्टीने पावलं पडायला लागलीत. आम्ही हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. आरोपींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी युक्तिवादही केला. पोलिसांनी त्यादृष्टीने भक्कम बाजू ही मांडली. मात्र नव्या कायद्याच्या आधारावर न्यायालयाने आरोपींना जामीन दिला. असा दावा वाकड पोलिसांनी केलाय. 

आरोपी पसार झाले तर?

नातेवाईकांशी चर्चा करुन, नव्या कायद्यामुळं जामीन मिळाल्याचा दावा वाकड पोलिसांनी केलाय. मात्र या तिघांना पुन्हा एकदा अटक करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयाकडे मागणी करणार असल्याचं वाकड पोलीस म्हणालेत. त्या दृष्टीने पावलं आता पोलिसांनी टाकायला सुरुवात केलीये. ती परवानगी मिळेपर्यंत हे तिन्ही आरोपी पसार होणात नाहीत, याची खबरदारी पोलीस घेणार का? याकडे ही सर्वांचं लक्ष लागून आहे.

Read More