Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं होणारी एकमेव मागणी आणि मतदारांच्या मनातली गोष्ट म्हणजे शिवसेनेमध्ये पडलेली दरी मिटणं. अर्थात उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं एकत्र यावं असा सूर आजवर अनेकांनीच आळवला, अधूनमधून तसे संकेतही मिळाले. पण, प्रत्यक्षात मात्र या चर्चा हवेतच विरून गेल्या.
आता मात्र या चर्चांना अनुसरूनच एक सोशल मीडिया पोस्ट करण्यात आल्यानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवसेना UBTच्या अधिकृत पेजवरुन करण्यात आलेल्या एका पोस्टमुळं या सर्वांच्या नजरा इथं खिळल्या आहेत.
"वेळ आली आहे एकत्र येण्याची,
मुंबई आणि महाराष्ट्रासाठी
शिवसैनिक तयार आहे,
मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी" अशा आशयाची पोस्ट शिवसेना UBTच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी राज आणि उद्धव ठाकरेंनी दिलेले एकत्रीकरणाचे संकेत लवकरच प्रत्यक्षात उतरतील का ? आणि गेल्या अनेक वर्षांपासून असलेली प्रतीक्षा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याने पूर्ण होईल का? हाच सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
वरील शब्द आणि जनमानसाच्या गर्दीतून सर्वांचं अभिवादन स्वीकारणारे उद्धव ठाकरे या पोस्टमध्ये दिसत असून, आता हे शब्द नेमके काय सुचवू पाहत आहेत, याचाच तर्कवितर्क सध्या लावला जात आहे.
वेळ आलीयं, एकत्र येण्याची
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 26, 2025
मुंबई आणि महाराष्ट्रासाठी
शिवसैनिक तयार आहे,
मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी! pic.twitter.com/aukbsiNPK5
एकिकडे या चर्चा सुरु असतानाच काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आलेल्या राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा संदर्भही दिला जात आहे. उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण वाटत नाही, असं ते म्हणाले होते. "कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमची भांडणं, आमच्या गोष्टी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात फार काही कठीण वाटत नाही", असं स्पष्ट मत मांडत त्यांनी नात्याची ही बाजू सर्वांसमोर ठेवली होती.