Aurangzeb Tomb Letter To President: मुघल शासक औरंगजेबच्या कबरीसंदर्भातील वाद मागील काही आठवड्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत असतानाच आता हे प्रकरण थेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंपर्यंत पोहोचला आहे. औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करण्याच्या मागणीसाठी मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून साकडे घातले आहे. या पत्रामध्ये खुलताबादमधील औरंगजेबच्या कबरीच्या संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी हे पत्र भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना, महाराष्ट्र राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासहीत स्थानिक पोलीस यंत्रणासह महत्वाच्या लोकांना पाठवले आहे.
प्रिन्स याकूब हबीबुद्दीन मुघल कुटुंबांचे उत्तर अधिकारी आहेत. त्यांनी पाठवलेल्या या पत्रामध्ये, मी मुगल कुटुंबांचा उत्तर अधिकारी आहे असं नमूद केलं आहे. "मी मुगल कुटुंबांचा उत्तर अधिकारी आहे. शेवटचे मुघल बहादूर शाह जफर यांचा पनतू आहे. माझे पूर्वज बादशहा औरंगजेबची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. औरंगजेबच्या इच्छेनुसार ही कबर अत्यंत साधी आहे. गेल्या काही दिवसांपासून काही लोक ही कबर उखडून फेकण्याची मागणी करत आहेत," असं म्हणत प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टुसी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
पुढे या पत्रामध्ये, "औरंगजेबचा जन्म भारतात झाला आणि मृत्यूही भारतातच झाला. भारतीय संविधानानुसार प्रत्येक माणसाला या देशात राहण्याचा आणि इथेच मरण्याचा अधिकार आहे," असं प्रिन्स याकूब हबीबुद्दीन यांनी पत्रात म्हटलं आहे.
"सध्या औरंगजेबाची कबर वफ्फची प्रॉपर्टी असून ती भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिपत्याखाली आहे. काही लोक इतिहासाची मोडतोड करत आहे आणि दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे. असले प्रयत्न हाणून पाडण्याचे सरकारचे काम आहे. मी राष्ट्रपती महोदय यांच्या लक्षात आणून देत आहे की, मी या जागेचा मुतवली आणि आणि जिथे औरंगजेबाची कबर आहे त्याचा संरक्षक आहे. त्यामुळे माझी विनंती आहे या प्रॉपर्टीचं महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने संरक्षण करावे. तसेच याबाबत योग्य ते आदेश तातडीने संबंधित यंत्रणांना द्यावे," असं पत्राच्या शेवटी प्रिन्स याकूब हबीबुद्दीन यांनी म्हटलं आहे.