Pune Kundmala Bridge Collapse News: पुण्यातील कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान 25 ते 30 पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू असणाऱ्या या पुलावर 200 ते 250 लोक होते अशी माहिती नदीतून बचावलेल्या तरुणाने सांगितलं आहे. दरम्यान घटनास्थळी 18 ते 20 रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. तसंच NDRFच पथकही पोहोचलं असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
दुर्घटनेतून बचावलेल्या गणेश पवार या तरुणाने सांगितलं की, "मी ब्रीजवर बाईकवर होतो. मी देखील खाली पाण्यात पडलो होतो. मी पाण्यातून वर निघालो. माझ्यासोबत 4 ते 5 जणांना मी पाण्यातून बाहेर काढलं. वरती काढल्यानंतर मी पलीकडे जाऊन बाईक घेतली आणि इंदुरीवरुन परत आलो".
यावेळी त्याने 200 ते 250 लोक पुलावर होते असा खुलासा केला. 2 ते 3 जण वाहून गेले असतील अशी शक्यता त्याने सांगितली. 75 टक्के लोक बाहेर निघाले, 25 टक्के आत होते असंही त्याने सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट शेअर करत सांगितलं आहे की, "पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत".
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे.