Crime News: होणारा नवरा पसंत नसल्याने त्याला थेट जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांगडे हिचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम याच्यासोबत होणार होता. मात्र मयुरीला सागर सोबत लग्न करायचं नसल्याने सागर कदम याला जिवे मारण्याचा कट रचला. मयुरी दांगडे आणि संदीप गावडे यांनी तब्बल एक लाख 50 हजार रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार यवत पोलिसांच्या तपासात समोर आला आहे.
याप्रकरणी यवत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील मयुरी दांडगे ही सध्या फरार आहे. आदित्य शंकर दांडगे, संदीप दादा गावडे, शिवाजी रामदास जरे, सुरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर जयसिंग कदम याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती. कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील असणारा सागर कदम हा हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करतो. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील खामगाव फाटानजीक यवत पोलिसांच्या हद्दीत एका हॉटेलच्या परिसरात सागर कदम याला काही जणांनी रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता यातील संशयित आरोपी आदित्य शंकर दांगडे रा. गुघलवडगाव ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतलं असून आरोपींनी वापरलेली वेरणा कंपनीची पांढऱ्या रंगाची चार चाकी कार देखील ताब्यात घेतली आहे. मयुरी दांगडे हिला सागर कदम सोबत लग्न करायचे नव्हते, म्हणून तिने 1 लाख 5 0 हजार रुपयांची सुपारी देऊन ही मारहाण घडवून आणल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. सध्या मयुरी दांडगे ही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहे.